नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड परिसरात विनयभंगाचे प्रकार वाढले असून बुधवारी (दि.११) वेगवेगळया भागात राहणा-या दोघींचा परिचीतांकडूनच विनयभंग करण्यात आला. त्यातील एकीचा शेजा-याकडून तर दुसरीचा दुचाकीस्वाराने विनयभंग केला. याप्रकरणी नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार घरासमोरील ओट्यावर बसलेल्या महिलेचा रविंद्र मिलीमाणी नामक शेजाºयाने विनयभंग केला. याबाबत हनुमाननगर भागात राहणा-या पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे शेजारी आहेत. बुधवारी (दि.११) सायंकाळी पीडिता स्वयंपाक आटोपून घराबाहेरील ओट्यावर बसलेली असतांना ही घटना घडली. संशयित शेजा-याने अश्लिल हावभाव करीत पीडितेचा विनयभंग केला. भेदरलेल्या महिलेने पळ काढत घरात घुसून दरवाजा लावून घेतला असता संशयिताने दरवाजावर लाथा मारत घरात बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने मज्जाव केला असता त्याने शिवीगाळ केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
दुसरी घटना शिखरेवाडी भागात घडली. पीडिता बुधवारी (दि.११) रात्री जीम वरून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. फेम सिग्नल पासून पाठलाग करणा-या गोपाल सुर्यवंशी (३७ रा.वडाळापाथर्डी रोड) याने शिखरेवाडी ग्राऊंड समोरील श्री बालाजी मदिर परिसरात महिलेची वाट अडवित मोबाईल नंबर मागण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार संदिप हिवाळे करीत आहेत.