नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रत्येकी पैसे गोळा करून यात्रा कंपनीने सहलीचे आमिष दाखवत ग्राहकांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐनवेळी यात्रा रद्द करीत पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. फसवणुक झालेल्या तब्बल १५ यात्रेकरूंनी याबाबत पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुर वाघ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याप्रकरणी निलेश किसन भोर (रा.सदगुरूनगर,दसक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वाघ याने गेल्या जानेवारी महिन्यात निमाणी परिसरातील शौर्य यात्रा कंपनीच्या माध्यमातून चारधाम यात्राचे आयोजन केले होते. या यात्रेसाठी भोर यांच्यासह अनेकांनी संपर्क साधत वाघ याच्याकडे प्रती सिट पैसे जमा केले होते. चारधाम यात्रेची तारीखही निश्चित करण्यात आली होती. यात्रेस जाण्याची अनेकांकडून तयारी सुरू असतांनाच संशयिताने यात्रा रद्द केली.
पुढील तारीख देत त्याने काही दिवस लोटले मात्र त्यानंतर ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे देत टोलवाटोलवी केली. यामुळे पंधराहून अधिक ग्राहकांनी पोलीसात धाव घेतली असून तक्रारीत ४ लाख २६ हजार ९५० रूपयांना संशयिताने गंडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.