नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हात उसनवार घेतलेली रक्कम आणि भूखंड खरेदी विक्री व्यवहारात बांधकाम व्यावसायीक कंपनीच्या संचालकांनी मुंबईतील एकास कोट्यावधींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ५० लाखाचा धनादेश न वटल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी मुंबईननाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरविंद पटेल, प्रदिप पटेल व चेतन पटेल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बांधकाम व्यावसायीकांची नावे आहेत. याबाबत चिंतन किशोर सावला (रा.वडाळा पूर्व मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. मधुर बिल्डवेल प्रा.लि. कंपनीचे पटेल व फिर्यादी सावला यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक व्यवहार आहेत. सन.२०१३ – २०१४ मध्ये पटेल यांना संशयितांनी पळसे शिवारातील प्लॉट नं. १७ ते २१ असे एकुण ३२२२ स्वेअर मिटर प्लॉट देण्याचे आमिष दाखवून या व्यवहारात एक कोटी रूपये स्विकारले होते. तर ४२ लाख ५५ हजार ९०० रूपये धनादेशाद्वारे अदा करण्यात आले होते.
दीड कोटीहून अधिक रक्कम अदा करण्यात आलेली असतांना संशयितांनी अद्याप प्लॉटची खरेदी करून दिली नाही. तसेच सुमारे अकरा वर्षा पूर्वीही संशयितांनी सावला यांच्याकडून मोठी रक्कम घेतली होती. या रकमेच्या मोबदल्यात दोन कोटी ७५ लाख रूपये देण्याचे ठरले होते. तसे धनादेशही संशयितांनी सावला यांना दिले होते. मात्र ५० लाखाचा पहिलाच धनादेश बँकेतून न वटता परत आल्याने सावला यांनी तगादा लावला असता संशयितांनी टाळाटाळ केल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.