नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तणनाशक फवारणी करून शेजा-यांनी द्राक्ष बागेचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत द्राक्ष बाग जळून खाक झाल्याने शेतक-याचे सुमारे १२ लाखाचे नुकसान झाले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब रमेश बर्वे (रा.माडसांगवी ता.जि.नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित शेजारी शेतक-याचे नाव आहे. याबाबत समाधान किसन धारबळे (रा.मेनरोड आडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. धारबळे यांची माडसांगवी शिवारात शेतजमिन आहे. गट नं. २२९० मध्ये त्यांनी द्राक्ष बागेची लागवड केली आहे. मार्च महिन्यात संशयित बर्वे यास द्राक्ष बागे जवळील शेतात तणनाशक फवारण्यास हटकल्याने हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
संशयिताने अज्ञात साथीदारांच्या मदतीने जाणून बुजून धारबळे यांच्या बागेवर तणनाशक औषधाची फवारणी केल्याने हे नुकसान झाले असून, संशयिताच्या शेतातील फवारणी नंतर प्लॉटच्या कडेचे तीन ते चार लाईनचे नुकसान झाले असते मात्र संपूर्ण बागच जळून खाक झाल्याने संशयिताने हे नुकसान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार राजुळे करीत आहेत.