नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सख्या भावाचे अपहरण करून त्यास डांबून ठेवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पित्याने याबाबत थोरल्या मुलावर संशय व्यक्त केल्याने याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरालाल रविंद्रकुमार मौर्या (रा.त्रिकोणी बंगला हिरावाडी) व अनोळी इसम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रविंद्रकुमार रामलखन मौर्या (६० रा.अश्वमेधनगर,आरटीओ समोर पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे. मौर्या यांचा लहान मुलगा राज मौर्या हा गेल्या जानेवारी महिन्यापासून बेपत्ता आहे. ११ जानेवारी रोजी सकाळी तो नेहमी प्रमाणे नानावली येथील लक्ष्मी फ्लोअर मिल येथे कामास गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी न आल्याने मौर्या कुटुंबियांनी शोधाशोध केली असता तो कामावर आला नसल्याची माहिती मिळाली. तेव्हा पासून तो बेपत्ता आहे. रविंद्रकुमार मौर्या यांना तीन मुले आहेत.
थोरला हिरालाल याचा २०१५ मध्ये विवाह झाला. तेव्हा पासून तो पत्नी पुजास सोबत घेवून स्वतंत्र राहत आहेत. वेळोवेळी हिरालाल व त्याच्या पत्नीने गावाकडील तसेच नाशिक व शिर्डी येथील मालमत्तेच्या विभागणी करण्याच्या कारणातून वाद घातला. मुलगा राज बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशीही त्याने आपल्या घरी येवून पत्नी व दोघा मुलांशी वाद घालत राज यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या रागातूनच कोणाच्या तरी मदतीने राज याचे अपहरण करीत त्यास डांबून ठेवल्याचा अंदाज तक्रारीत व्यक्त करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार करीत आहेत.
……….