नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– निर्भय पक्ष पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू असून मुंबईनाका पोलीस ठाण्यात आता पुन्हा खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील बदनामीकारक व्हिडीओ मागे घेण्याच्या मोबदल्यात एक लाखांच्या खंडणीची मागणी करीत महिलेचे सोन्याचे दागिणे बळजबरीने काढून घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेत दांम्पत्यास मारहाण केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र भावे, प्रसाद घोटेकर, राजेंद्र गायधनी व त्यांचा एक कार्यकर्ता अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत एका पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. महिला व तिचा पती गेल्या १४ जून २०२२ मध्ये लहान बाळास सोबत घेवून जितेंद्र भावे यांच्या पौर्णिमा स्टॉप येथील कार्यालयात गेले होते. यावेळी राजन पाटील यांनी गैरसमजातून तक्रार दिली होती ती त्यांनी मागे घेतली. मात्र तुम्ही शहानिशा न करता सोशल मीडियावर बदनामी कारक व्हिडीओ व्हायरल केला. तो व्हिडीओ डिलीट करून दुसरी पोस्ट टाकण्याची विनंती पीडित दांम्पत्याने केली असता भावे यानी सेटलमेंट करण्याची ग्वाही देत एक लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली.
यावेळी महिलेच्या पतीने नोकरीवर नसल्याने पैसे देवू शकत नसल्याचे सांगितल्याने भावे यांनी महिलेचा विनयभंग केला. तर अन्य कार्यकर्त्यांनी दांम्पत्यास मारहाण केली. यावेळी पत्नी व मुलास डांबून ठेवण्याची धमकी देण्यात आल्याने भेदरलेल्या महिलेने गळयातील मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी असा सुमारे ३५ हजाराचा ऐवज संशयितांच्या स्वाधिन केला. याप्रसंगी उर्वरीत पैश्यांसाठी दाम्पत्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.