नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भागीदारीतील व्यवसायाचे आमिष दाखवत भामट्यांनी एका व्यावसायीकाला तब्बल ८६ लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. भांडवलासह बँक कर्ज मंजूरीसाठी भामट्यांनी ही रक्कम उकळली असून, साडे तीन वर्ष उलटूनही कुठलाही मोबदला पदरात न पडल्याने व्यावसायीकाने पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजीत नारायण पाटील, रोशनी अजित पाटील (रा.दोघे अलिबाग जि.रायगड) व रामदास पोपलेट उर्फ प्रविण पाटील (रा.खारघर नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठकबाजांची नावे आहेत. याबाबत प्रशांत दामोदर कातकाडे (रा.येवला रोड मनमाड,ता.नादगाव) यांनी फिर्याद दिली आहे. कातकाडे यांची आॅक्टोबर २०२१ मध्ये संशयितांची भेट झाली होती. या भेटीत पाटील दांम्पत्याने कातकाडे यांचा विश्वास संपादन करीत एकत्रीत कृषी माल निर्यात व सप्लाय चैन व्यवसायाचे आमिष दाखविले. कातकाडे गळाला लागताच संशयितांनी व्यवसाय सुरू असल्याचे भासवून भांडवलापोटी ६० लाख ७५ हजाराची रक्कम कातकाडे यांना गुंतविण्यास भाग पाडले.
एवढ्यावरच न थांबता भामट्या दांम्पत्याने प्रविण पाटील हा युको बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून कर्ज प्रकरण मंजूर करण्याच्या नावाखाली व कागदपत्र पुर्ततेच्या बहाण्याने कातकडे यांच्याकडून पुन्हा २५ लाख ५० हजार रूपये उकळले. मात्र साडे तीन वर्ष उलटूनही एक रूपयाही पदरात न पडल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच कातकाडे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे करीत आहेत.