नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंचवटीतील अमरधाम भागात तीन जणाच्या टोळक्याने मंगळवारी (दि.१५) मध्यरात्री धुडघूस घातला. घरासमोर पार्क केलेली कार पेटवून देत या त्रिकुटाने रिक्षाच्या काचा फोडल्या. या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंता राजेंद्र पाटील (रा.अमरधाम शेजारी पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी रात्री अज्ञात तीन समाजकंटकांनी हे कृत्य केले असून ही घटना परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली आहे. मध्यरात्री आलेल्या त्रिकुटाने पाटील यांची घरासमोर पार्क केलेली कार एमएच ०१ एएक्स ०८१० हिच्यावर टाकलेले कव्हर पेटवून देत कारला आग लावली.
या घटनेत गाडीचा वरचा भाग जळून नुकसान झाले आहे. याच वेळी समाजकंटकांनी जवळच उभ्या असलेल्या एमएच १५ ईएच २३५७ या अॅटोरिक्षा कडे आपला मोर्चा वळवित रिक्षाच्या काचा कश्याच्या तरी सहाय्याने फोडून सुमारे १५ हजार रूपयांचे नुकसान केले आहे. अधिक तपास हवालदार काळे करीत आहेत.