नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंदूकीचा धाक दाखवत शहरातील एका व्यावसायीकाचे सिनेस्टाईल अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.४) घडली. या घटनेत घोटी टोलनाका परिसरात गोळीबार करण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. अपहृत व्यावसायीकाने कशीबशी सुटका करून घेतली असली तरी अपहरण कर्त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीसांनी आता थेट महामार्गावरील आठ कि.मी पर्यंतचे सीसीटिव्ही फुटेज तपासणचे काम हाती घेतले आहे.
निखिल प्रदीप दयार्नानी (वय २७, रा. टाकळी रोड, उपनगर) या व्यावसायिकाने मुंबई नाका पोलिसांत याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीस ते पस्तीस वयोगटातील तीन अज्ञात संशयितांविरुद्ध अपहरण, शस्त्र वापरणे व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल दर्यानानी यांच्या तक्रारीनुसार शुक्रवारी (दि. ४) दुपारी सव्वा तीन वाजता एमएच १६ सीई २०२० क्रमांकाची निखिलच्या मालकीची कार नाशिक-पुणे रस्त्यावरील काठेगल्ली सिग्नल येथून पुढे जात होती. त्यावेळी दोघांनी कार थांबवून बोलायचे आहे असे म्हणत कारचा दरवाजा खोलण्यास सांगितला. निखिल यांनी कारचा दरवाजा उघडताच संशयित कारमध्ये बळजबरीने शिरले. त्यांनी निखिलच्या डोक्यावर बंदूक धरून नाशिक-मुंबई महामार्गावरुन इगतपुरीकडे कार नेण्यास सांगितले.
विल्होळीजवळ तिसरा संशयित आल्यावर निखिलच्या कारमधून उतरत सर्व जण दुस-या कारमध्ये बसले. या दरम्यान तिस-या संशयिताने निखिलची कार ताबा घेत ती शहरात एका ठिकाणी उभी केली. उर्वरित दोघे दुस-या कारमधून घोटी नाक्याकडून भंडारदराकडे जाणा-या रस्त्यावर गेले. तेथून निखिलला खाली उतरवून जमिनीवर आणि हवेत गोळीबार केला, असा दावा फियार्दीत करण्यात आला आहे. दरम्यान, संशयितांनी पैसे मागितल्यावर निखिलने त्याच्या बंधूंना फोन करुन कार घेवून गेलेल्या तीस-या साथीदारकडे पंधरा लाख देण्यास सांगितले. ही रक्कम अदा करण्यात आल्यानंतर निखीलला शहरात आणण्यात आले. पाथर्डी फाटा भागात निखीलने अपहरण कर्त्यांच्या हातावर तुरी देवून पोलीस ठाणे गाठले होते. या घटनाक्रमाची सत्यता पडताळून पोलीसांचा पुढील तपास सुरू आहे