नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सोमवारी (दि.३१) वेगवेगळय़ा भागात राहणा-या चौघांनी आत्महत्या केली. त्यातील तिघांनी गळफास लावून घेत तर एका वयोवृध्द मनोरूग्णाने स्व:ताच्या दोन्ही हातावर धारदार वस्तूने कापून घेत आपले जीवन संपविले. चारही जणांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत पंचवटी,अंबड व आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पेठरोडवरील रविंद्र रामदास माळी (६८ रा.राजश्री रो हाऊस,नामको हॉस्पिटलमागे) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या गॅलरीमधील लोखंडी गजाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा मिलींद माळी यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. दुसरी घटना हिरावाडीत घडली. भिकाजी विठोबा नवहिरे (८५ रा.स्मृतीसागर) या वयोवृध्द मनोरूग्णाने गेल्या २१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून काही तरी धारदार वस्तूने दोन्ही हातावर कापून घेतले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ नजीकच्या सदगुरू हॉस्पिटल येथे दाखल केले असता सोमवारी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास अधिक तपास हवालदार भोये व गांगुर्डे करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोत घडली. कोमल सचिन मुंडावरे (२५ रा.महालक्ष्मी प्राईड एकदंतनगर,भोळे मंगल कार्यालयाजवळ ) या विवाहितेने सोमवारी सायंकाळी अज्ञात कारणातू आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. दिर कल्पेश मुंडावरे यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टिळेकर करीत आहेत.
तर गिरीधर काशिनाथ सानकर (२२ रा.श्री.नगरकर यांचे फार्म हाऊस हनुमान मंदिराच्या पुढे माडसांगवी ता.जि.नाशिक) या युवकाने सोमवारी रात्री अज्ञात कारणातून राहत्या ठिकाणी छताच्या लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत संदिप वरकड यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.