नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– घरासमोर सोंगवून ठेवलेल्या गव्हाच्या गोण्या चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना वरवंडी रोडवरील आळंदी कॅनोल भागात घडली. या घटनेत सुमारे ३६ हजार रूपये किमतीचा बारा क्विंटल गहू भामट्यांनी पळविला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल बबनराव देशमुख (रा.देशमुख फार्म आळंदी कॅनोल म्हसरूळ वरवंडी रोड) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या शेतात लागन केलेल्या गव्हाची सोंगणी केली. सफेद गोण्यांमध्ये भरलेल्या गव्हाची त्यांनी आपल्या घरासमोर थप्पी मारून ठेवली असता ही घटना घडली. शनिवारी (दि.२९) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कुठल्यातरी वाहनातून सुमारे ३६ हजार रूपये किमतीचा गहू चोरून नेला. अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.
महिलांनी लोखंडी ब्लॉक चोरून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंद कारखान्यात शिरून भामट्या महिलांनी लोखंडी ब्लॉक चोरून नेले. ही घटना औद्योगीक वसाहतीतील शार्पटेक इंजिनिअरींग कंपनीत घडली. हा प्रकार सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाला असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलिम रसूल शेख (रा.इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली आहे. शेख औद्योगीक वसाहतीतील शॉर्प टेक कंपनीचे काम पाहतात रविवारी (दि.३०) सकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्या महिलांनी कंपनीत प्रवेश करून सुमारे २१ हजार रूपये किमतीचे सात लोखंडी ब्लॉक चोरून नेले. ही घटना सीसीटिव्ही कॅमेºयात कैद झाल्याने शेख यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार साळवे करीत आहेत.