नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- साडी विक्री व्यवसायातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकास भामट्यांनी १५ लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंतवणुकीपोटी एक रूपया न देता भामट्यांनी टोलवाटोलवी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविंद्र अग्रवाल,तेजस अग्रवाल, तेजस उर्फ गुड्डू गरड,प्रणव निकम, राजेंद्र जाधव व सुरज सरोवर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत किशोर गोपालराव घोडके (रा.काठेगल्ली,द्वारका) यानी फिर्याद दिली आहे. घोडके यांचा काठे गल्ली येथे कापडविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची तेजस अग्रवालशी ओळख झाली. साडी विक्रीतून नफा मिळवून तो अर्धा-अर्धा वाटून घेण्याचे आमिष दाखविण्यात आल्याने ही फसवणुक झाली.
घोडके यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये विश्वासाने प्रथम नऊ लाख, त्यानंतर सहा लाख अशी रक्कम अग्रवाल बापलेकाच्या स्वाधिन केली. या रकमेच्या त्याने साड्या खरेदी केल्या. त्यानंतर मात्र व्यापा-याकडे पैसे अडकून पडले आहेत, असे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ केली. काही दिवसानंतर पुन्हा घोडके यांनी तगादा लावला असता खासगी सावकार तेजस गरड, गुड्डू, प्रणव निकम, राजेंद्र रामराव जाधव, सूरज सरोवर यांच्याकडून तेजस अग्रवाल याने व्याजाने पैसे घेतले होते. ते परतफेड केले नसल्याने त्यांनी साड्यांचा माल उचलून नेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात येताच घोडके यानी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक श्रीनिवास देशमुख करीत आहेत.