नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– फोनवर शिवीगाळ केल्याच्या वादातून टोळक्याने चार मुलांना डांबून ठेवत प्लॅस्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना अमरधाम परिसरात घडली. या घटनेत अल्पवयीन मुले जखमी झाले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर कुमावत, ऋषी पगारे (रा.दोघे शितळा देवी जवळ,अमरधामरोड) व शेखर राजेंद्र जगताप (रा.मोदकेश्वर वसाहत काझी गढी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार विशाल वाघ यांनी फिर्र्याद दिली आहे. संशयित शेखर जगताप यास ओम प्रकाश पवार (१४ रा.चित्रघंटा जुने नाशिक) व सोनू संजय चुनाडी (१४ रा.विसपुते वाडा,शनी चौक) यानी मोबाईलवर संपर्क साधत शिवीगाळ केली होती. यावादातून ही घटना घडली. संशयितांनी संगनमत करून मंगळवारी (दि.२५) रात्री ओम पवार व सोनू चुनाडी याना अमरधाम भागात समझोता करण्यासाठी बोलावून घेतले.
यावेळी दोघा बरोबरच सौरभ जयप्रकाश पोद्दार (१९ रा.मोदकेश्वर वसाहत काझीगढी) व कृषणा बळीराम चव्हाण (२१ रा.देवी मंदिराजवळ चव्हाटा) हे दोघे मित्रही गेले असता संशयितांनी त्यांना लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी भागात घेवून जात चौघांना प्लॅस्टीक पाईपाने बेदम मारहाण करीत नजीकच्या सिक्यूरिटी गार्डसाठी बनविलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले. या घटनेत दोघे अल्पवयीन मित्र जखमी झाले असून मध्यरात्री गस्ती पथकास संशयास्पद हालचाली आढळून आल्याने त्यानी धाव घेतली असता हा प्रकार समोर आला. पथकाने चार मुलांची सुखरूप सुटका केली असून अधिक तपास उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.