नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिक्षा प्रवासात मुंबई येथील महिलेच्या रोकडसह दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. नाशिकरोड ते द्वारका दरम्यान घडली. या घटनेत सुमारे सव्वा लाख रूपये किमतीचा ऐवज भामट्या सहमहिला प्रवासींनी लांबविल्याचा अंदाज असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्मिता विजयकुमार शहा (रा.अंधेरी,मुंबई ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शहा बुधवारी (दि.१२) माहेरी जाण्यासाठी मुंबई येथून रेल्वेने शहरात दाखल झाल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी नाशिकरोड येथून रिक्षाने प्रवास केला. रिक्षात तीन महिला सोबत होत्या. प्रवासात अज्ञात भामट्या महिलेने त्यांच्या पर्समधील २० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ३० हजाराचा ऐवज लांबविला असून हा प्रकार शहा या द्वारका परिसरातील एका दुकानात चिवडा घेण्यासाठी गेल्या असता उघडकीस आला.
पर्स मधील रोकड व दागिणे चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.