नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालक खंडणी कसा देत नाही असे म्हणत त्रिकुटाने नोकरावर हल्ला केल्याची घटना मालधक्कारोड भागात घडली. या घटनेत धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने नोकर जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरज श्याम कदम,अशोक राजू गौंड व आदी संतोष आढाव (रा.गुलालवाडी,मालधक्कारोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खंडणीखोर संशयितांची नावे आहेत. याबाबत सिध्दार्थ खंडू आढाव (२६ रा. समाबाई आंबेडकरनगर,गुलाबवाडी) या युवकाने फिर्याद दिली आहे. आढाव मालधक्का येथील एका व्यावसायीकाकडे कामास आहे. शनिवारी (दि.२५) सायंकाळी तो कामावरून घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली.
अशोक गौड याच्या घराजवळून तो पायी जात असतांना संशयित त्रिकुटाने त्याची वाट अडविली. मालधक्का येथील आनंद ट्रान्सपोर्ट भागात झालेल्या जुन्या वादाची कुरापत काढून संशयितांनी खडणीची मागणी केली. तुझा मालक अमित कलंत्री हा दरडोई हजार रूपये किंवा दरमहा दोन लाख रूपयांचा हप्ता कसा देत नाही असे म्हणून त्यांनी आढाव सिध्दार्थ आढाव यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत आदी आढाव याने धारदार शस्त्राने वार केल्याने सिध्दार्थ आढाव हा नोकर जखमी झाला असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.