दीपक ओढेकर, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची येत्या तीन वर्षासाठी निवडण्यात येणाऱ्या कार्यकारिणीची निवडणूक शनिवारी ३ मे २०२५ रोजी होत आहे. निवडणूक केवळ आठ दिवासांवर येउनही प्रथमच कोणतीही हवा किंवा चर्चाच नाही, असे का? याची कारण म्हणजे धनपाल शहा आणि त्यांच्या वेळोवेळी बरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी गेल्या वीस वर्षात नाशिक मधील क्रिकेट वृद्धीसाठी केलेले भरपूर असे प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि निरपेक्ष काम. त्यामुळे सुमारे ३१२० सभासद आणि ७६ क्लब मतदार असलेल्या संघटनेतील मतदारात कोणाला निवडून द्यायचे किंवा कोणाच्या ताब्यात संघटना द्यावी याबद्दल दुमत दिसत नाही.
कारण प्रश्न नाशिकच्या क्रिकेटचा, क्रिकेटपटूच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे सभासद कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही. इतके उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड धनपाल शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले. वर्षभर सर्व गट आणि महिला व पुरुष असे दोघांसाठी सुमारे ४०० सामने, सुमारे १५० खेळाडू राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर खेळतात तसेच अनेक पंच आणि इतर तंत्रज्ञ हे राज्य पातळीवरील सामन्यात आणि राज्य संघटनेत काम करताना दिसत आहेत ही मोठी जमेची बाजू म्हणता येईल.
क्रिकेट संबंधित आणि संघटनेच्या कामाकाजाबाबत सर्व क्षेत्रात – इन्फ्रास्ट्रक्चर, administration, प्रशिक्षक आणि खेळाडूंची निवड आणि आर्थिक स्थिती या सर्व बाबत – पारदर्शक, योग्य आणि सर्व घटकांच्या हिताचे निर्णय घेण्यात संघटनेने कोणतीही कुचराई केल्याचे दिसले नाही. कठीण किंवा अप्रिय निर्णय घ्यायलाही आणि वेळ पडल्या वर नाशिकच्या आणि क्रिकेट पटूच्या हितासाठी महाराष्ट्र क्रीकेट संघटनेबरोबर संघर्ष न करता ठाम भूमिका घ्यायला मागेपुढे पाहिले नाही.
अशा प्रकारे इतके उत्तम काम केल्या नंतर जर जास्तीतजास्त सभासदांनी २० वर्षात सातत्याने धनपाल शहा आणि सहकारी यांच्यावर प्रचंड विश्वास दाखविला तर आश्चर्य वाटायला नको. तथापि संघटनेचे काम हे कधीही न संपणारे असते त्यासाठी पुढील तीन वर्षासाठी आणखी नवीन योजना – रात्रीचे सामने घेण्यासाठी फ्लॅडलाईट्स, उत्तर महाराष्ट्राचे वर्षभर चालणारे झोनल कोचिंग सेंटर नाशिकला सुरु करणे, नाशिकमधील प्रत्येक तालुक्यापर्यंत चांगली मैदाने आणि इतर सुविधा निर्माण करणे, महिला क्रिकेट अधिक व्यापक करणे व महिलांच्या राज्य किंवा राष्टीय पातळीवरील स्पर्धा भरविणे इ योजना घेऊन पुन्हा त्यांची टीम मतदारां पुढे येत आहे. आता यातील किती प्रत्यक्षात येतील हे इच्छाशक्ती आणि त्यांना राज्याकडून आणि सभासदांकडून मिळणाऱ्या सहकार्यावर अवलंबून आहे.
पण गेल्या २० वर्षाचा इतिहास बघता वरील योजना केवळ आश्वासन न वाटता प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाटते. २०२८ च्या निवडणूकिआधी यातील बरीच किंवा सगळी कामे झाली असतील अशी आशा करू या!
दीपक ओढेकर
( ज्येष्ठ क्रीडा पत्रकार )