नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भुतप्रेतबाधा,करणी, भानामती ,जादुटोणा,ज्योतीष सांगुन अघोरी उपचाराची जाहिरात करणारे अनेक भोंदुबाबा असतात. ते भक्तांना अलगतपणे फसवितात. त्यापैकी अनेक भोंदु परराज्यात असल्याने पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे तक्रारदार हतबल होऊन हा विषय तिथेच संपवतात. मात्र नाशिकमधील एका महिलेने खंबीरपणे लढत झालेल्या फसवणुकीबद्दल न्याय मिळवला आहे. इतकेच नाही तर सदर भोंदुबाबाने तक्रारदार महिलेला मुळ रक्कमेसह दंड व त्रासापोटी रक्कम देण्याचा आदेश नाशिक जिल्हा तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्वागत करून हा पथदर्शक निर्णय असल्याचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक मधील ऊंटवाडी,सिडको परिसरातील एका महिलेला कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी सोशल मीडियाद्वारे उत्तर प्रदेशातील कानपुर जिल्ह्यातील ग्राम करौली येथील लवकुश आश्रमाचे महाराज संतोष सिंग भदोरिया यांचा संपर्क झाला. सदर महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना भुतबाधा झाल्याची सांगुन एका दिवसाची चिकित्सा करण्यासाठी दोन लाख एकावन्न हजार रुपये भोंदुबाबाने मागितले. सदर रक्कम बॅन्क ऑफ बडोदा मार्फत आरटीजीएसने पाठविले. तसा पैसे पाठविल्याचा महिलेकडे पुरावा होता. सदर भोंदुबाबाने आश्रमात बसुन ऑनलाईन विधी केल्याचे सांगितले. परंतु त्या तोडग्याने महिला व तिच्या परीवारास कोणताही गुण आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने भोंदुबाबाकडे रक्कम परत करण्याची मागणी केली मात्र भोंदबाबाने त्यास साफ नकार दिला.
सदर महिलेने ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चा आधार घेऊन नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली. आयोगाने याची पडताळणी करुन भोंदुबाबाने दिशाभूल करणारी जाहिरात करुन महिलेला फसवणूक करत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करत सेवा देण्यात कमतरता केल्याचे स्पष्ट केले.त्यामुळे भोंदुबाबाने तक्रारदार महिलेस मुळ रक्कम दोन लाख एकावन्न हजार रुपये २८/०२/२०२३ पासुन ते रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. १० % व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले. तसेच भोंदुबाबाला दंड म्हणून पन्नास हजार रुपये व शारीरिक व मानसिक त्रासापोटी पंधरा हजार रुपये महिलेस देण्याचे आदेश दिले. तक्रारदार महिलेचा तक्रार अर्जाचा खर्च रक्कम सात हजार रुपये अदा करण्याचा निर्णय दिला आहे.या निर्णयाचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,नाशिकने स्वागत केले आहे.अशा प्रकारे फसविल्या गेलेल्या भाविकांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे,असे त्यांनी आवाहन केले आहे.
हा निर्णय पथदर्शक
सामान्य लोकांच्या असाह्यतेचा फायदा घेऊन अनेक भोंदुबाबा खोटे आमिष दाखवून फसवणूक करत आसतात. बर्याच वेळी भोंदुबाबा परप्रांतीय असल्याने न्याय मिळण्याची अपेक्षा उरत नाही. परंतु हा निर्णय पथदर्शक असल्याने अशा भोंदुबाबांवर अंकुश बसेल. तक्रारदारांनी अशा प्रकारे पुढे यावे”
-कृष्णा चांदगुडे
राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस