नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक विमानतळावर नवीन धावपट्टीस मंजुरी मिळाली आहे. नाशिक विमानतळावरील सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने (HAL) घेतला असून या धावपट्टीसाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक विमानतळाच्या विकासासाठी गती मिळणार असून नाशिकमध्ये हवाई वाहतुकीसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यांनी १६ जुलै २०२४ व २१ जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) अंतर्गत या धावपट्टीला मंजुरी देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पडताळणी सुविधेसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सला मान्यता दिली आहे. यामुळे भविष्यात नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरू करणे शक्य झाले आहे. या निर्णयामुळे छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे.
छगन भुजबळ यांच्या मागणीनुसार हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने या नवीन धावपट्टीच्या निर्मितीसाठी २०० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नाशिक शहराची भविष्यातील गरज पाहता विमानतळाची उड्डाणक्षमता अधिक वाढणार आहे. या निर्णयानंतर नवीन धावपट्टीचे आरेखन व इतर तांत्रिक बाबींसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून सल्लागार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित एजन्सीकडून तांत्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर धावपट्टी तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे.तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण होताच ही धावपट्टी तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाईल. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या धावपट्टीचे काम पूर्ण होण्यास साधारणतः २ वर्षांचा कालावधी लागणार आहे.नवीन धावपट्टी ही सध्याच्या धावपट्टीप्रमाणेच ३ किलोमीटर लांब व ४५ मीटर रुंद असणार आहे. २०२२ साली धावपट्टीची डागडुजी सुरू असताना तब्बल १४ दिवस नाशिकचे विमानतळ ठप्प पडले होते, नवीन धावपट्टीच्या निर्मितीनंतर डागडुजी सुरू असतानाही विमानतळ सक्रिय ठेवणे शक्य होणार आहे. तसेच हे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक देश विदेशातील हवाई नकाशावर जोडले जाणार असून नाशिकच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.