नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर परिसरातील वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा नाशिकरोड व आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
मखमलाबाद येथील विष्णू जयराम शिणमान (६९ रा.शांतीनगर) हे गेल्या १६ मार्च रोजी एमएच १५ जेजे ३०६४ या अॅक्टीव्हा दुचाकीने चोपडा लॉन्स कडून मखमलाबादच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. चोपडा लॉन्स समोर अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हवालदार बागुल यांनी दिलेल्या खबरीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डगळे करीत आहेत.
दुसरा अपघात नाशिक पुणा मार्गावरील शिंदे गावाजवळ झाला. आत्माराम रमेश पोपेरे (२६ रा. कोंभाळणे ता. अकोलो जि.अहमदनगर) हा युवक गुरूवारी (दि.५) सकाळी अकारा वाजेच्या सुमारास सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने एमएच १७ आर ९३८ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. शिंदे गावाजवळील उड्डाणपूल भागात पुढे जाणा-या इनोव्हा कार जीजे १५ सीसी ९५९४ वरिल चालकाने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीव इनोव्हा कारवर जावून आदळली होती. या अपघातात पोपेरे यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी अंमलदार वृंदावन गिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक अनिल पवार करीत आहेत.
तिसरा अपघात दसक पुल परिसरात झाला. भाऊशाहेब कचरू सानप (४८ रा. गुळवंत ता.सिन्नर) हे गुरूवारी (दि.५) दुपारच्या सुमारास नांदूरनाक्याकडून नाशिकरोडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. दसक पुलाजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने सानप गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.