नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अपघाताचे सत्र सुरूच असून, वेगवेगळया अपघातात तरूणीसह दोन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ, इंदिरानगर व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठरोडीवरील आरटीओ सिग्नल भागात बेदारक मालवाहू पिकअपने (एमएच १५ एचएच ७३०३) अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात जयश्री संजय सोनवणे (२३ रा. दिंडोरीरोड) या दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला तर हितेश संजय सोनवणे (३० रा.सदर), जयदेव लक्ष्मण महाले (२१ रा.साईदर्शन कॉलनी,धुळे ) व घनश्याम भरत महाले (१९ रा. वरवंडी ता.दिंडोरी) आदी जखमी झाले आहेत. जयश्री व हितेश सोनवणे हे दोघे भाऊ बहिण गुरूवारी (दि.१) शालिमार येथे डबलसिट जात असतांना हा अपघात झाला. एमएच १५ सीई ०९७३ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना बाराच्या सुमारास ते दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नर भागात सिग्नलवर थांबले होते. यावेळी पाठीमागून बेदारक आलेल्या एमएच १५ एचएच ७३०३ या मालवाहू पिकअपने अनेक दुचाकींना धडक दिली. या अपघातात वरिल सर्व जखमी झाले असून त्यातील जयश्री सोनवणे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत हितेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पिकअप चालक अनिल मच्छीद्र साळवे (रा.रामेश्वरनगर,दिंडोरीरोड) याच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.
दुसरा अपघात पाथर्डी फाटा भागात झाला. या अपघातात विजय धोंडीराम सुर्यवंशी (३३ रा.सदाशिवनगर पाथर्डीफाटा) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सुर्यवंशी बुधवारी (दि.३०) रात्री महामार्गाने एमएच १५ सीबी ३८६५ या दुचाकीवर आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. नयनतारा प्रोजक्ट समोरील सर्व्हीस रोडने ते प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ एचसी ३६४० या कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी भाऊ विक्रम सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
तर अरूण लक्ष्मण साळवे (४५) हे गेल्या १० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आपल्या मेव्हण्यांसमवेत दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. त्र्यंबकरोडने दोघे सातपूरकडून सिबीएसच्या दिशेने प्रवास करीत असतांना बांधकाम भवन भागात भरधाव दुचाकी घसरली. या अपघातात साळवे गंभीर जखमी झाले होते. जिल्हारूग्णालया मार्फत त्यांना श्रीजी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन प्रभाकर गायकवाड (३६ रा.पंचशिल कॉलनी शेजारी शिवाजीनगर) यांच्या विरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.