नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धावत्या दुचाकीवरून पडल्याने वेगवेगळया भागात राहणा-या दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यातील वृध्द महिला आपल्या नातूसमवेत प्रवास करीत होती. याप्रकरणी मुंबईनाका व म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भाभानगर येथील संगिता संजय जोशी (५८ रा.उत्कर्ष हौ.सोसा.) या गेल्या दहा दिवसांपूर्वी आपल्या सोसायटीच्या आवारात स्कुटीवरून पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या खुब्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शनिवारी (दि.२९) मध्यरात्री त्यांनी झोपेत कुठलीही हालचाल न केल्याने कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार डंबाळे करीत आहेत.
दुसरा अपघात बापू पुलाजवळ झाला. या अपघातात हिराबाई लक्ष्मण तांदळे (७४ रा.दत्तनगर,पेठरोड) यांचा मृत्यू झाला. तांदळे गेल्या गुरूवारी (दि.२०) सायंकाळी नातू रोहन तांदळे याच्या मोटारसायकलवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. गंगापूररोडकडून आजी आणि नातू आपल्या घराकडे जात असतांना आसाराम बापू पुलाजवळ हिराबाई तांदळे या धावत्या दुचाकीवरून तोल जावून पडल्या होत्या. मुलगा सुनिल तांदळे यांनी त्यांना तात्काळ श्रीगुरूजी हॉस्पिटल मार्फत रविवारी (दि.३०) जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बाळनोथ करीत आहेत.