नाशिक : नांदगांव तालुका व शहराचे पूर परीस्थितीपासून कायमचे संरक्षण होण्यासाठी शाश्वत उपाययोजनांचे नियोजन करुन, टप्प्या-टप्प्याने त्या प्राप्त निधीनुसार राबविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नांदगाव तालुक्यांतील संबंधीत यंत्रणांना दिले आहेत. आज जिल्हाधिकारी मांढरे यांनी नांदगाव तालुक्यांतील व शहरातील पूरग्रस्त भागांना भेटी देवून पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुहास कांदे उपविभागीय अधिकारी सोपान कासार, तहसिलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी विवेक धांडे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले,सरकारकडे योग्य भरपाईची मागणी सादर करण्यासाठी, तलाठ्यांकडून करण्यात येत असलेल्या पंचनामांची क्रॉस पडताळणी, व क्षेत्रिय स्तरावर ई-पीक पाहणी ची अंमलबजावणी पाहण्यासाठी हा दौरा कारणांसाठी होता. यामध्ये नांदगाव शहरी भागातील शाकंबरी नदीवरील स्मशानभुमीकडे जाणाऱ्या पुरमुळे वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी (नगर परिषद , नांदगाव )यांना या पुलाचे बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नदीचे पात्र गाळामुळे अरुंद झाल्यामुळे पात्र रुंदीकरणासाठी शासनाचे नगर विकास विभागाकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करून, आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या दरम्यान लेंडी नदीवरील जोडणारा पुलास कठडे बसविणे, घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे जाणारा रस्ता दुरुस्त करणे, शहरातील रेल्वे अंडरपासमुळे पाणी साचून गावात पाणी येत असल्याबाबत रेल्वे विभागाशी पंधरा दिवसात बैठक घेणे, लेंडी नदी पात्रात नागरीकांनी टाकलेल्या टपऱ्या कायमस्वरुपी काढून टाकण्याचा व टपरीधारकांना पर्यायी जागा देण्योचा प्रस्ताव तयार करुन त्यांना सुवर्ण जयंती रोजगार योजनेतून कर्ज उभारुण देण्याचा प्रस्ताव नगर परिषदेने तयार करणेबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील मौजे साकोरा येथे सर्जेराव नारायण छत्रे , गिरीधर सुरसे दिगंबर सुरसे , यांच्या शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन तलाठी यांनी केलेल्या नुकसान पंचनाम्याची पडताळणी केली.तसेच साकोरा गावाजवळील मोरखडी पाझर तलावाचा बांध फुटल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. माझी शेती माझा सातबारा , मीच नोंदविणार माझा पीक पेरा या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या ई पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा घरबसल्या उपलब्ध करुन देण्यात आली आहे . नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबर , २०२१ पर्यंत आपल्या पिकांची ई- पीक पाहणी नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी केले. तालुक्यातील मौजे गंगाधरी येथील शेतकरी जयंत गंगाधर जुन्नरे ,सुनिल गंगाधर जुन्नरे पिक मका यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी ॲपवर प्रात्यक्षिक करत च, ई-पीक पाहणी ॲपबद्दल माहिती जाणून घेत, येणाऱ्या अडचणी जिल्हाधिकारी मांढरे यांनी समजून घेतल्या.