नामदेव समाजोन्नती परिषदेच्या महाअधिवेशनात आश्वासन…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या वतीने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास कामासाठी सुमारे ८४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामाची सुरुवात संत नामदेव पायरीच्या सुशोभीकरणापासूनच करण्यात येईल, असे आश्वासन पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिले.
नामदेव सामाजोन्नती परिषदेचे ५५ वे तीन दिवसीय महाअधिवेशन आणि नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वा राज्यव्यापी भव्य वधू वर पालक परिचय मेळावा, तुपसाखरे लॉन्स, नाशिक येथे शनिवार, दि. २४ रोजी आयोजित करण्यात आला. या अधिवेशन व मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून गहिनीनाथ महाराज बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नामदेव समाजोन्नती परिषदेचे नुतन राज्य अध्यक्ष संजीव तूपसाखरे, नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अतुल मानकर, रवींद्र रहाणे, दत्ताजी शिंपी, अरविंद तापसे, वृषाली तूपसाखरे, वासंती राहणे, अर्चना मानकर, तसेच नामदेव सामाजोन्नती परिषदेचे पदाधिकारी डॉ. अजय फुटाणे, बाळासाहेब आंबेकर, संजय निवासकर, रोहित यावतकर अशोक कालेकर, राजेंद्र पोरे, रमेश बकरे, वसंत खुर्द, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आपले विचार मांडताना गहिनीनाथ महाराज म्हणाले की, संत नामदेव महाराज हे संत शिरोमणी होते, आपल्या जीवनात नाम आणि देव दोघांचे अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याची वारकरी संप्रदायात धारणा आहे. पंढरपूरला येणारा प्रत्येक वारकरी हा प्रचंड गर्दीमुळे कदाचित विठ्ठल रुक्मिणीचे मूर्तीचे दर्शन घेऊ शकत नाही. परंतु नामदेव पायरीवर डोके टेकवल्याशिवाय राहत नाही, वारकरी संप्रदायात नामदेव पायरीचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, असेही महाराज म्हणाले.
राज्य शासनाने पंढरपूर मंदिर परिसर विकास कामासाठी सुमारे ८४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामाची सुरुवात संत नामदेव पायरीच्या सुशोभीकरणापासूनच करण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या कार्तिक वारी पर्यंत संत नामदेव पायरी करण्याचे काम पूर्ण होईल. तसेच मंदिराचे नुतनीकरण करण्याचे काम लवकरच सुरू होणार असून यासाठी सर्व वारकरी संप्रदायाचे सहकार्य लाभत आहे, असेही महाराज यांनी सांगितले. गहिनीनाथ महाराज पुढे म्हणाले की, आजच्या काळात सामुदायिक विवाह ही काळाची गरज असून त्यासाठी अशा प्रकारच्या विवाह सोहळ्यांना चांगला दर्जा दिला पाहिजे, केवळ गरिबांचेच नव्हे तर सर्वच समाजातील वधू-वरांचे विवाह सामायिक विवाह सोहळ्यामध्ये व्हायला हवेत, असेही त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नामदेव समाजोन्नती परिषदेचे राज्य अध्यक्ष संजीव तूपसाखरे यांनी सांगितले की, संत नामदेव समाजोन्नती परिषद आणि नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने राज्यव्यापी वधू-वर पालक परिचय मेळावा घेण्यात येत असून या भव्य मेळाव्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे. तसेच पंढरपूरच्या संत नामदेव पायरी सुशोभीकरणाचे काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे, यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत, तसेच संत नामदेवांचे भव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, या कामाला गती मिळावी यासाठी परिषदेमार्फत प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे नामदेव शिंपी समाजाच्या राज्यभरातील अनेक शहर व गावांमध्ये जागा असून या जागा काही लोकांना वापरायला दिल्या आहेत, परंतु त्या जागा सामाजिक कार्यासाठी समाजाला परत कराव्यात, परिषदेच्या वतीने पंढरपूर ते घुमान अशी सायकल यात्रा काढण्यात आली होती, याची माहितीही यावेळी तूपसाखरे यांनी दिली. याप्रसंगी गहिनीनाथ महाराज यांना परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात पंढरपूरच्या संत नामदेव पायरीचे नूतनीकरण करून त्याला चांदीचा पत्रा लावून सोन्याचा मुलामा देण्यात यावा, तसेच सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अतुल मानकर यांनी राज्यव्यापी वधु वर मेळाव्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्री संत नामदेवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. परिषद व मंडळाच्या वतीने गहिनीनाथ महाराज तसेच मान्यवरांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताजी शिंपी यांनी केले, तर अतुल मानकर यांनी आभार मानले.
याप्रसंगी कार्यक्रमास धनंजय खर्डे, सचिन निरगुडे, विजय खंदारे, शामसुंदर राहणे, सूर्यकांत धटिंगण, प्रवीण पवार, सुनील शिंपी, मधुकर लचके, डॉ. के. आर. शिंपी, बाळासाहेब खर्डे, रत्नाकर लुंगे, कैलास निरगुडे, राजेंद्र करमासे, अरुण लचके, त्र्यंबक काळे, सोमनाथ खंदारे, योगेश वारे, रमेश झांबरे, रमेश चांडोले, अशालता वेल्हाळ, उषा मुळे, उषा पोरे, स्वाती पिसे, गीता धोंडगे, सुवर्णा गीते आदींसह मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी वधु वर पालक परिचय मेळाव्यास प्रारंभ झाला. या मेळाव्यात सुमारे विवाह इच्छुक ४०० युवक आणि ३०० युवतींनी तसेच त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास राज्यभरातून नामदेव शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सायंकाळी नामदेव समाजोन्नती परिषदेचे खुले अधिवेशन झाले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. उद्या रविवार दि. २५ सप्टेंबर रोजी महसूल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नामदेव समाजोन्नती परिषदेचे त्रैवार्षिक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी परिषदेचे राज्य अध्यक्ष संजीव तूपसाखरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.