मुंबई(इंडिया दर्पण वृत्तसेवा)-62 व्या राष्ट्रीय सागरी दिन तसेच व्यापारी नौदल सप्ताहाच्या निमित्ताने आज मुंबईतील दादर समुद्रकिनाऱ्यावर अर्थात मुंबईतल्या प्रसिद्ध दादर चौपाटी परिसरात एक विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राष्ट्रीय सागरी दिन समारोह समिती (National Maritime Day Celebrations Committee – NMDC) आणि भारत सरकारच्या बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अखत्यारितील नौवहन महासंचालनालयाने (Directorate General of Shipping) संयुक्तपणे हा व्यापक उपक्रम आयोजित केला होता. या मोहिमेत सागरी महाविद्यालयांचे विद्यार्थी, विविध शाळांचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना (National Cadet Corps – NCC), राष्ट्रीय सेवा योजना (National Service Scheme – NSS), नौकानयन क्षेत्रातील तज्ज्ञ, खलाशी आणि जय फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. जबाबदारीच्या जाणीवेसह या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींची विद्यार्थी आणि स्वयंसेवकांची संख्या जवळपास 600 इतकी होती. या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने अथक प्रयत्न करत जवळपास 1 टन कचरा संकलित केला आणि, दादर चौपाटीला पुन्हा एकदा स्वच्छता आणि सौंदर्याचा नवा आयाम मिळवून दिला. स्वच्छतेप्रति समर्पण दाखवत या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने समाजभावना आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोनाचे उल्लेखनीय दर्शन घडवले.
या स्वच्छता मोहिमेला गांभीर्याची जोड देत आयोजकांनी मोहिमेत सहभागी झालेल्यांसाठी हातमोजे, कचरा संकलनासाठीच्या पिशव्या अशी स्वच्छतेसाठी आवश्यक साधने पुरवली होती. या अभियानाच्या यशस्वी आयोजनात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (Maharashtra Maritime Board), मेरीटाईम युनियन ऑफ इंडिया (Maritime Union of India), नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया (National Union of Seafarers of India) आणि एमएससी क्रूईंग प्रा. लि. (MSC Crewing Pvt. Ltd.) यांनी मोलाच्या सहकार्याचे योगदान दिले.
दादर पश्चिमेकडील शिवाजी पार्क मधील नारळी बागेतल्या अर्धवर्तुळाकार सभागृहात (Amphitheater) झालेल्या सभेने या उपक्रमाचा प्रारंभ झाला. समृद्ध सागर – विकसित भारत आणि निळ्या अर्थव्यवस्थेसाठी युवा वर्गाचे योगदान अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. यावेळी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी (IRS), नौवहन महासंचालनालयाचे उप महासंचालक आणि राष्ट्रीय सागरी दिन समारोह समितीचे (केंद्रीय) सदस्य सचिव डॉ. पांडुरंग के. राऊत यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. उपस्थितांशी साधलेल्या संवादातून त्या़नी महासागरीय परिसंस्था कशा रितीने कोट्यवधी लोकांसाठी रोजगार आणि अन्नाचा स्रोत आहे याची जाणीव करून दिली. सागरी परिसंस्थेचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या प्रभावांना मर्यादित ठेवण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. महासागरीय परिसंस्थेशी जोडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी नौवहनाच्या योगदानाविषयी देखील त्यांनी सांगितले. आपल्या सगळ्यांसाठीच महासागरीय परिसंस्था म्हणजे एक प्रकारची जबाबदारी आणि त्याचवेळी संधी सुद्धा आहे ही बाबही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सागरी क्षेत्रातील कारकिर्दीच्या संधींबाबतही तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले. नवी मुंबईतील रेहमान या प्रशिक्षण मालवाहू जहाजाचे, प्राचार्य कॅप्टन (डॉ.) आशुतोष आपणकर, मुंबईतील भारतीय सागरी विद्यापीठाचे (Indian Maritime University) संचालक कॅप्टन मिहीर चंद्रा आणि सागरी शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे संचालक मोहनसिंग पाल यांनी या क्षेत्रातील उपलब्ध संधींविषयी उपस्थितांना मार्गदर्शनपर माहिती दिली.
या उपक्रमात सहभागी झालेल्या भारती सागरी मालवाहूक महामंडळ (Shipping Corporation of India – SCI) आणि सागरी प्रशिक्षण संस्थेच्या (Maritime Training Institute – MTI) विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला जनजागृतीपर नाट्य सादरीकरणाची जोड दिली. या विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रथम या नाटिकेतून स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. या नाटिकेच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेची यशस्वी सांगता झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल प्रशस्तिपत्र देऊन प्रोत्साहन दिले गेले. या उपक्रमाचा औपचारिक समारोप करताना भारती भंडारकर यांनी आयोजक आणि सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार मानले.
या उपक्रमाने राष्ट्रीय सागरी दिनाच्या महत्त्व अधोरेखित झाले आणि त्याच बरोबरीने युवा वर्गात सामाजिक तसेच पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव निर्माण केली. यामुळे नील अर्थव्यवस्था (Blue Economy) आणि हरित विकास (Green Growth), युवा वर्गाचा प्रत्यक्ष सहभाग आणि योगदान वाढण्यालाही मोठा हातभार लागला.