मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेमसंबंधांतून गर्भवती झालेली महिला बाळाला जन्म देऊन घर सोडून निघून गेली. ही पीडिता वर्षभरात सापडली तर तिच्याशी लग्न करा असे निर्देश देत हायकोर्टाने एका प्रकरणातील आरोपीला दिले आहेत. तसेच या अटीवर त्याचा जामीन मंजूर केला असून, पीडितेनं जन्म दिलेल्या बाळाचं पालकत्व स्वीकारण्याचे निर्देशही हायकोर्टानं जारी करत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
या प्रकरणातील आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या शेजारी राहत होते. त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याची दोघांच्याही घरच्यांना माहिती होती. या संबंधातून पीडिता गर्भवती राहिली पण आरोपीने मात्र लग्नाला नकार दिला. पीडितेने जानेवारी महिन्यात मुंबईतील रुग्णालयात बाळाला जन्म दिला पण त्यानंतर तिसऱ्याच दिवशी ती बाळाला मरीन लाईन्सला सोडून निघून गेली. तिथल्या एका सुरक्षारक्षकाने बाळाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी बाळाला अनाथ आश्रमात ठेवत त्याच्या फरार आईविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडिता पोलीस ठाण्यात आली आणि तिनं बलात्काराची तक्रार देत आरोपीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला. मात्र, समाजाच्या भीतीपोटी ती घरातून निघून गेली जी आजपर्यंत गायब आहे. आपल्या गर्भारपणामुळे कुटुंबाची मानहानी होऊ नये म्हणून पीडीतेनं हा निर्णय घेतल्याचा घरच्यांचा दावा आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्या आरोपीने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. ज्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी झाली.
वर्षभरात पीडिता सापडली नाही तर आरोपीची अटीतून मुक्तता
हायकोर्टाने परिस्थितीचा विचार करता लहान बाळाच्या भवितव्याला प्राधान्य दिले आहे. आरोपीने जर पीडीतेशी वर्षभरात लग्न केले तर त्याला कायमचा जामिन मिळू शकतो, अशी अट न्यायालयाने आरोपीसमोर ठेवली आहे. न्यायालयाची ही अट आरोपीने लेखी स्वरूपात मान्य करताना सोबत स्वतःच्या मुलाचे पालकत्वही स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आरोपीच्या आई वडिलांच्यावतीने देखील न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. पीडीताही सज्ञान असून तिच्याशी विवाह करण्यास आरोपी तयार आहे. त्या दोघांचेही प्रेमसंबंध होते. त्यामुळे एका वर्षात जर ती सापडली तर आरोपीनं तिच्याबरोबर लग्न करावं. मात्र जर एका वर्षात पीडीतेचा शोध लागला नाही तर आरोपीची या अटीतून मुक्तता होईल, असं न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलेलं आहे.
Mumbai High Court Rape Case Accused