नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या ११२ शिक्षणक्रमांच्या परीक्षेचे येत्या मंगळवार दिनांक २७ मे ते दिनांक १७ जून २०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ च्या प्रवेशित नियमित विद्यार्थांची सत्र तथा वार्षिक परीक्षा व जानेवारी २०२५ च्या सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची ही लेखी परिक्षा राज्यभरातील ५८० परीक्षा केंद्रांवर होईल. त्यासाठी जवळपास ४ लाख २५ हजार २०८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे विद्यापीठाची दिनांक १ जून ची पूर्वघोषित परीक्षा रद्द करून ती पुढे नियोजित करण्यात आली आहे.
विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरदार, व्यावसायिक, पोलीस, सैनिक, गृहिणी, शिक्षक, कामगार इत्यादी समाजातील विविध घटकातील आहेत. विशेष म्हणजे त्यात १२१ जेष्ठ नागरिक व राज्यातील विविध तुरुंगातील ३०१६ कैदी यांचा समावेश आहे. त्यांच्याद्वारे या परीक्षेत विविध विषय मिळून २७ लाख २८ हजार ४०२ उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत. परीक्षा सुरळीत होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शन सूचना विभागीय केंद्रांमार्फत परीक्षा केंद्रांना देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac या पोर्टलवरील Examination या शीर्षकाखाली मे २०२५ परीक्षेची संपूर्ण माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे. या संकेतस्थळाला विद्यार्थ्यांनी अद्ययावत माहिती करीता वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दिनांक ०१ जून २०२५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एम. पी. एस. सी.) वर्ग ‘क’ ची परीक्षा असल्याने मुक्त विद्यापीठाद्वारे यापूर्वी घोषित दि. ०१ जून २०२५ रोजीची परीक्षा पुढे ढकलण्यात येवून सुधारित तारखांबाबत परिपत्रक क्र.१८ व १९ द्वारे संबंधित परीक्षा केंद्रांना व विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या परीक्षा प्रवेशपत्रावर (हॉल तिकीट) परिपत्रकानुसार सुधारित तारखेची नोंद करून प्रवेश पत्र उपलब्ध करून दिले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी ते पोर्टलवरून डाऊनलोड करून घ्यावे. प्रवेश पत्रावर नमूद केलेली तारीख आणि वेळेनुसारच परीक्षा द्यावयाची आहे. प्रवेशपत्रानुसार परीक्षेला उपस्थित रहावे, याची नोंद घेण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या परीक्षा सुरु होत असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.