नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आपल्या विविध शिक्षणक्रम आणि शैक्षणिक आदान प्रदान व्यवहार यामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाचा मोठ्या कौशल्याने वापर करत आहे. त्यामुळे लवकरच हे विद्यापीठ राज्यातील प्रथम डिजीटल विद्यापीठ म्हणून नावारूपास येईल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३० वा दीक्षान्त सोहळा सकाळी दहा वाजता विद्यापीठ आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. अशोक कोळस्कर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, राज्यपाल यांचे प्रधान सचिव प्रशांत नानावरे, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. डॉ. संजीवनी महाले, प्रा. एन. के. दास व श्री. अनिल गावित, वित्त समिती सदस्य डॉ. वाणी लातूरकर, कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील व विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात पुढे बोलतांना माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की शिक्षण हे प्रत्येकाच्या विकासाचे प्रवेशद्वार आहे. असे शिक्षण प्राप्त केल्यानंतरच त्याचे महत्व कळून येते. त्या अनुषंगाने विविध वैयक्तिक कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे, वंचितांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य हे विद्यापीठ करत आलेले आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्याचे कार्य देखील सुरु आहे. सध्या सर्वच क्षेत्रात जग बदलत आहे. त्यामुळे जगातील नामांकित अशा अनेक विद्यापीठांनी मुक्त व दूरस्थ शिक्षण पद्धतीचा अवलंब केलेला दिसून येतो. पण त्यांचे शिक्षण आजही महागडे आहे. त्यातुलनेत आपले हे मुक्त विद्यापीठ कमी शुल्कात व दर्जेदार शैक्षणिक साहित्यासह उत्कृष्ठ शिक्षण प्रदान करत आहे. जगात कौशल्याधारीत मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. त्यानुसार काळाची कास पकडत आपल्या या मुक्त विद्यापीठाने तीन महिने पासून वर्षभर मुदतीचे विविध नवीन अभ्यासक्रम सुरु केले आहेत. वाढवन बंदर प्रकल्प साठी विद्यापीठाने कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी केलेला सामंजस्य करार हे त्याचेच प्रतिक आहे. विद्यापीठाचा स्वच्छ व पर्यावरण पूरक हरित परिसर, सौर उर्जा आधारित वीज निर्मिती प्रकल्प हे शाश्वत विकासाचे प्रतिक असल्याचे ते म्हणाले. तसेच विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेला कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित प्रशिक्षण कार्यक्रम, कॅनडा येथे मुख्यालय स्थित असलेल्या व दिल्ली येथील कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया (सेमका) सोबत, नक्षलग्रस्त भागात वंचितांसाठी पोलीस स्थानकांमध्ये व राज्यातील कारागृहांमध्ये बंदिवानांसाठी विद्यापीठाचे सुरु असलेल्या शैक्षणिक कार्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी विशेष कौतुक केले. आगामी सन २०४७ पर्यंत आपल्या भारत देशास प्रगत राष्ट्र बनवायचे आहे. त्यादृष्टीने सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन देखील त्यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले.
तत्पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. अशोक कोळस्कर यांनी दीक्षांत भाषण केले. त्यात ते म्हणाले की हा केवळ पदवीदान नव्हे तर शिक्षण शक्तीवर विश्वास असलेल्या व चिकाटीने अडीअडचणींवर मात करत शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी आणि त्यांना मदत करणारे त्यांचे पालक – आप्त – मित्रपरिवार यांचा सोहळा आहे. विद्यापीठातर्फे सुरु करण्यात आल्या अनेक नवोपक्रमांचा त्यांनी कौतुक केले. तसेच शिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात अनेक समस्या व अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण त्यामुळे घाबरून व खचून न जाता विद्यार्थ्यांनी त्यांचा सामना करावा व त्यावर मोठ्या हिमतीने मात करावी. केवळ थेअरी माहित असून उपयोग नाही तर प्रश्न सोडवता आला पाहिजे, हे सुत्र वास्तविक जीवनात देखील लागू पडते. विद्यार्थ्यांनी स्वत;च्या क्षमतांवर विश्वास ठेवावा त्यासोबत बदलत्या काळासोबत नवीन गोष्टी देखील शिकायला सदैव तयार रहावे असे आवाहन माजी कुलगुरू प्रा. अशोक कोळस्कर यांनी दीक्षांत भाषणाच्या शेवटी केले.
विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी विद्यापीठ अहवाल सादर केला. त्यात त्यांनी विद्यापीठाचे नक्षलग्रस्त भागातील व कारागृहातील बंदिवानांसाठी सुरु असलेले अभ्यासकेंद्रे, शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित प्रशिक्षण, विद्यापीठ आवारातील कृषी विज्ञान केंद्राचे विविध उपक्रम यांचा प्रामुख्याने उल्लेख केला. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे लोकविद्यापीठ असल्याचे सांगितले. तसेच आपल्या भाषणात बोलतांना पुढे ते म्हणाले की बदलत्या कालानुसार विद्यापीठाने विविध कौशल्याधारित शिक्षणक्रम सुरु केलेले आहेत. १० लाख रोजगार क्षमता असणाऱ्या आगामी वाढवन बंदर येथे विद्यापीठातर्फे ‘यशवंतराव चव्हाण वाढवन बंदर प्रशिक्षण केंद्र’ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच विद्यापीठास पूर्ण डिजीटल विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर आगामी तीन वर्षात विद्यापीठाची ऑनलाईन विद्यार्थी संख्या ही एक कोटी करण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे मोठ्या विश्वासाने सांगितले.
तत्पूर्वी माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रांजल प्रकाशराव गायकवाड (बी.ए.), नेहा अशोक घोरपडे (जन्संद्यापण व पत्रकारिता), सखाराम सान्या उघाडे (एम. बी. ए.) हृषीकेश जगदीश बगाडी (एम. कोम), सुवर्णा अर्जुन भांडेकर (बी. कॉम), शिवकन्या सुधाकर करडे (शिक्षणशास्त्र), श्रेयस ओमप्रकाश दुबे (बीसीए), मीरा आनंदराव देशमुख (एम. एस्सी. भौतिकशास्त्र), अनुश्री गणेशराव देशकरी ((एम. एस्सी. गणित) या नऊ विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे सुवर्णपदक देवून गौरवण्यात आले. तसेच प्रांजल प्रकाशराव गायकवाड या विद्ययार्थणीस प्रातिनिधिक स्वरूपात blockchain तंतज्ञानवर आधारित QR कोड असलेल्या पदवीची डिजिटल कॉपी देखील त्यांना माननीय कुलपती यांच्या शुभहस्ते हस्तांतरित करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी पाटील व श्री. दत्ता पाटील यांनी केले.
या ३० व्या दीक्षान्त समारंभांप्रसंगी पीएच. डी., पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या ९६ शिक्षणक्रमांतील १ लाख ३९ हजार २१८ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली गेली. त्याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्या पदवीधारकात ६० वर्ष वयावरील १९५ विद्यार्थी, १२१ दृष्टीबाधित विद्यार्थी, विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेले ३३ बंदीजन यांचा समावेश होता. तसेच एक लाख ३९ हजार २१८ पैकी पदविकाधारक १५ हजार ३७०, पदवीधारक ९१ हजार १९७, पदव्युत्तर पदवीधारक ३२ हजार ६४३, पी एच डी धारक ८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यात ८१ हजार ८७० विद्यार्थी व ५७ हजार ३४८ विद्यार्थिनी आहेत.
तत्पूर्वी सकाळी विद्यापीठ प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते फुले अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तसेच त्यांच्या हस्ते विद्यापीठ आवारात बकुळाच्या रोपट्याचे रोपण करणात आले. परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी ज्ञानदंडासह विद्वत मिरवणुकीचे नेतृत्व केले. प्रमुख मान्यवर यांच्या व्यतिरिक्त मंचावर विदयशाखांचे संचालक श्री. नागार्जून वाडेकर, डॉ. सु रेंद्र पाटोळे, डॉ. माधुरी सोनवणे, डॉ. चेतना कमळस्कर, श्री. माधव पळशीकर, प्रा. डॉ. जयदीप निकम, डॉ. राम ठाकर, डॉ. कविता साळुंके, डॉ. अभिषेक भागवत, डॉ. रश्मी रानडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी विद्वत परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे, प्रा प्रकाश देशमुख, प्रा. सज्जन थुल, डॉ दयाराम पवार, डॉ प्रकाश बर्वे, डॉ लतिका गायकवाड, डॉ मधुकर शेवाळे, विभागीय केंद्र संचालक सर्वश्री डॉ. वाय. पी. कलपेवार (नांदेड), डॉ. वामन नाखले (मुंबई), डॉ. नारायण मेहरे (नागपूर) व डॉ. एस. आर. निकम (नाशिक), श्री. गोविंद दबाळे (सरपंच गोवर्धन ग्रामपंचायत), श्री. बाळासाहेब लांबे (उपसरपंच गोवर्धन ग्रामपंचायत), श्री. पी. के. जाधव (माजी सरपंच गोवर्धन ग्रामपंचायत), नाशिकचे माजी महापौर श्री दशरथ पाटील, कैलास चौधरी, विनायक महाले (माजी सरपंच घनशेत ग्रामपंचायत) यांची देखील विशेष उपस्थिती होती.
एखादी पदवी प्राप्त करावी…राज्यपाल
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्याचा उल्लेख विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी आपल्या भाषणात केला होता. त्याचा उल्लेख पुन्हा आपल्या भाषणात करत माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की शिक्षण हे न थांबणारे आहे, त्यामुळे मला देखील आता या विद्यापीठातून एखादी पदवी प्राप्त करावीशी वाटत असल्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.
चैतन्य ओसंडून वाहत होते
या दीक्षांत समारंभानिमित्त विद्यापीठ आवार हे दीक्षांत शाल परिधान केलेले विविध वयोगटातील व राज्यभरातील विद्यार्थी – विद्यार्थिनी, त्यांचे पालक, मित्र परिवार व अभ्यागत यांनी अक्षरश: गजबजून गेले होते. विद्यापीठातील विविध नयनरम्य ठिकाणी हे विद्यार्थी – विद्यार्थी गप्पा गोष्टी व सेल्फी, समूह छायाचित्रे घेण्यात सकाळपासून मग्न दिसून येत होते. त्यामुळे विद्यापीठ आवारात एक वेगळेच चैतन्य ओसंडून वाहत असल्याचे जाणवत होते.
ब्लॉक चेन प्रणाली आधारित प्रमाणपत्र
दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आलेलया पदवी व पदविका प्रमाणपत्रे वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर ब्लॉक चेन प्रणालीवर आधारित क्यु आर कोड छापलेला होता . सदर क्यू आर कोड कुठेही व कधीही स्कॅन करून प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करता येत होती . पदवी / पदविका प्रमाणपत्राची डीजीटल कॉपी, ई-सुविधा मोबाईल ॲपमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध राहणार असून, दीक्षान्त समारंभ संपल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राची डीजीटल कॉपी डीजीलॉकरवर उपलब्ध करण्यात आली.
विशेष पुस्तक प्रदर्शन
या दीक्षांत समारंभानिमित्त सोहळा मंडपाबाहेर एक विशेष पुस्तक प्रदर्शन व विद्यापीठ नवोपक्रम माहिती प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यास विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार व अभ्यागत यांनी मोठ्या संख्येने भेट देत त्याची पाहणी केली.