नाशिक : भारतमाला योजनेत नुकताच द्वारका-दत्तमंदिर दरम्यानच्या प्रस्तावित उड्डाणपुलाचा समावेश झाल्याने निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुल आणि या दरम्यानची मेट्रो लाईन हे दोन ही प्रकल्प एकत्रितपणे उभारण्याचा निर्णय झाला आहे. द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुल, मेट्रो आणि सुरत-चेन्नई महामार्ग हे तीनही प्रकल्प शहरसाठी अंत्यत महत्त्वाचे असून भविष्यातील अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुल, मेट्रोसह सुरत-चेन्नई महामार्ग या तीनही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा डीपीआरमध्ये त्रुटी राहू नये, यासाठी सुक्ष्म नियोजन करुन प्रकल्पाची भक्कमपणे उभारणी करावी असे आवाहन खा. गोडसे यांनी केले आहे.
खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्न आणि सततच्या पाठपुराव्यामुळे उभारल्या जाणारे द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुल, मेट्रो आणि सुरत-चेन्नई महामार्ग हे प्रकल्प शहरासाठी वरदान ठरणारे आहेत. डीपीआर पूर्ण होण्याअगोदर या तीनही प्रकल्पांची माहिती केंद्राई इंजिनियर असोशिएशनसह विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांना मिळावी यासाठी खासदार गोडसे यांच्या पुढाकाराने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उंटवाडी येथील अभियंता कार्यालयात प्रकल्पांचे सादरीकरणाचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना खा. गोडसे यांनी वरील आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी बी.एस. साळुंके, आकार अभिनव एजन्सीचे विनय शर्मा, दिलीप शुक्ला, मेट्रोचे विकास नागुलकर, संकेत केळकर, केंड्राईचे रवि महाजन, अनंत जातेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चेन्नई-सुरत या महामार्गाचा प्रारंभ पेठ तालुक्यातून होत असून नाशिक, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर या तालुक्यांतील ६९ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. प्रस्तावित महामार्ग सहा पदरी असणार आहे. या महामार्गामुळे सुरत-नाशिक हे अंतर अवघे दोन तासांवर येणार आहे. सुमारे पाच किलोमीटर महामार्ग नाशिक महानगरपालिका हद्दीतून जाणार असून ७० मीटर रुंदीचा असणार आहे. या महामार्गामुळे पेठ, सुरगाणा तालुके पर्यटनसाठी विकसित होणार आहेत. महामार्गाच्या दोन ही बाजुस ७.५ मीटरचा सर्व्हिस रोड असणार आहे. महामार्गावर वळण खूपच कमी असणार असल्याने विविध शहरांमधील अंतर कमी होणार असून वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी टेनेल तर उमराणे, आडगाव, ओढा, वावी या चार ठिकाणी इंटर चेंजर असणार असून जितक्या किलोमीटरचा रस्ता वापराल तितकाच टोल भरण्याची व्यवस्था असणार आहे.
मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली त्या दरम्यानच द्वारका-दत्तमंदिर रस्त्याचा समावेश भारतमाला योजनेत झाला हा ही एक मोठा योगायोग जुळून आला असल्यानेच दोनही प्रकल्पांचे कामे एकत्रित करण्याचा निर्णय झाला आहे. या तीनही स्तरांमधील अंतर सतरा फुट उंचीचे असणार आहे. मेट्रो आणि सुरत-चेन्नई महामार्गाचा आराखडा अंतिम टप्यात असून लवकरच आराखडा पूर्ण होणार असल्याची माहिती नॅशनल महामार्गाचे व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी दिली. वरील तीनही प्रकल्पांचे आराखडे पूर्ण झाल्यावर पुन्हा एकत्रित बैठक घेवून काही सूचना असल्यास त्या सूचनांचा समोवश करण्यात येणार असल्याचे मेट्रो आणि नॅशनल हायवे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीप्रसंगी खा. गोडसे यांच्यासह उमेश वानखेडे, सचिन, बागड, सुशिल बागड, अनिल आहेर, अतुल शिंदे, रसिककुमार बोथरा, मनोज खिवंसरा, सागर शहा, आनंत ठाकरे, विजय चव्हाणके यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकल्प दृष्टिक्षेपात
द्वारका-दत्तमंदिर या दरम्यानच्या उड्डाणपुलाची रुंदी ४५ मीटर असणार आहे. या उड्डाणपुलाच्या दरम्यान सात ठिकाणी जक्शंन असणार असून जक्शंनवर चढण्या, उतरण्यासाठी ट्रॅम्प असणार आहेत. उड्डाणपुल चार लेनचा असणार असून दोन्ही बाजुचा सर्व्हिस रोड ५.५ तर रॅम्प ७.५ मीटरचा असणार आहे. सुमारे हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. द्वारका-दत्तमंदिर या दरम्यान तिहेरी वाहतूक व्यवस्था असणार आहे. रस्ता, त्यावर उड्डाणपुल त्यावर त्यावर मेट्रो असे नियोजन असणार आहे. वेळ आणि खर्च कमी व्हावा, यासाठी उड्डाणपुल आणि मेट्रो या दोनही प्रकल्पांचे काम एकत्रित करण्याचा निर्णय झाला आहे.