पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाला सुरुवात होऊन सुमारे एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप राज्यासह देशाच्या काही भागात पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. कदाचित जुलैमध्ये तरी पाऊस पडेल पुरेस चांगला पाऊस पडेल, या आशेवर बळीराजा आकाशाकडे आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. परंतु यंदा जुलै देखील समाधानकारक पाऊस पडणार नाही असे सांगण्यात येते. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये मात्र जोरदार पाऊस बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली तरी जूनमध्ये वाऱ्याचा वेग कमी असल्याने, तसेच किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा क्षीण झाल्यामुळे पावसाचा जोर कमी आहे. जुलैमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतरच्या दोन महिन्यात मात्र मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विशेष म्हणजे यंदा पावसाची सुरुवात खूप संथगतीने झाली. काही काळ दडी मारलेल्या पावसाचा जोर काहीसा वाढला असला, तरी राज्यातील सर्वच भागात पुरेसा पाऊस पडला नाही. फक्त कोकण आणि विदर्भातील गडचिरोली मध्ये सरासरी इतका पाऊस पडला. मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अद्याप पावसाची आवश्यकता आहे. राज्यातील तीन ते चार जिल्हे सोडले तर, उर्वरित जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे.
केरळ, कर्नाटकात पावसाची कामगिरी समाधानकारक नाही. या दोन्ही राज्यांत पावसाची कमतरता दिसून येत आहे. याउलट उत्तराखंड आणि आसाममध्ये मात्र काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे
वाऱ्याचा वेग मंदावल्याने जूनमध्ये पावसात खंड पडला. जूनच्या अखेरच्या दिवसात काहीसा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ापासून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पावसाचे प्रमाण चांगले राहील, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तर, शहरी भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावू लागला. धरणांतील पाणीसाठा आटल्याने धास्ती वाढली आहे. दरम्यान, मार्च, एप्रिल, मे महिन्यांचा अभ्यास केला असता, वाऱ्यांचा मंदावलेला वेग, कमी दाबाच्या क्षेत्राचा अभाव यामुळे पावसाची स्थिती समाधानकारक राहिली नाही, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.
यंदा दक्षिण भारतात केरळमध्ये सुमारे ५९ टक्के आणि कर्नाटकात सुमारे २६ टक्के पावसाची कमतरता जाणवली आहे. देशांत केरळ आणि कर्नाटकात सर्वात आधी मोसमी पावसाचे आगमन होते. मात्र, यावर्षी तमिळनाडूत सर्वाधिक पाऊस पडला. तर राज्यात सुमारे ५४ टक्के पावसाची कमतरता आढळली आहे. त्याचप्रमाणे कोकणात मुसळधारांचा आणि राज्यात पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज होता. गेल्या २४ तासांत कोकणातील काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
monsoon rainfall meteorological department forecast