मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता असताना म्हणजेच २०१८ मध्ये एक मोहिम राबविली होती. ती म्हणजे, रस्त्यातील खड्ड्यांप्रश्नी त्यांनी थेट सेल्फी आंदोलन सुरू केले होते. तेव्हा हे आंदोलन फारच चर्चेचे ठरले होते. शिवाय त्यास सर्वसामान्य नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. राज्याच्या सर्वच भागात रस्ते आणि महामार्गांना खड्ड्यांनी विळखा दिला आहे. त्याचा मोठा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. याची दखल घेत मनसेने सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. ताई, काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का, असा खोचक सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुळे यांना विचारला आहे. तसे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे हे ट्विट आणि पोस्ट सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?? pic.twitter.com/nwkjr6dX0d
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 30, 2021