मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काम करणाऱ्या माणसाला माझे नाव छापा असे सांगावे लागत नाही, तसेच कोणाला चहापाणी देखील पाजावे लागत नाहीत, राजकारणात अशी माणसे विरळ असतात. जे स्वतः काम करत राहतात आणि आपोआपच मतदार त्यांना निवडून देतात यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घ्यावे लागते असे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपासून गडकरी विशेष चर्चेत आहेत. गडकरी पुढची लोकसभा निवडणूक लढविणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. अखेर आता त्यासंदर्भात त्यांनीच मोठा खुलासा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी हे राजकारणातून निवृत्त होणार अशी चर्चा सुरू झाली आहे, याला कारण म्हणजे नितीन गडकरी यांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवर वेळोवेळी राजकारणाबद्दल स्पष्टपणे भाष्य केले आहे. सध्याचे राजकारण कसे आहे. याचे त्यांनी अनेक उदाहरणे दिले आहेत त्यामुळे नितीन गडकरी हे राजकारणातून निवृत्त होतात की काय असे अनेकांना वाटते. परंतु प्रत्यक्षात आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे कारण त्यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आता राजकारणातून निवृत्त होणार, अशा उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र, यावर भाष्य करत आपण पुढची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, महासंचालक जयराज फाटक, उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, गोविंद स्वरुप, दिग्विजय साने उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, निवडणुकीत लोकच मायबाप असतात ते निवडून देतात. मी आयुष्यात ठरविले की कोणाच्या गळ्यात हार टाकणार नाही. गेली ४० वर्षे कोणी माझ्या स्वागताला येत नाही. इतकेच नव्हे तर मी स्वत:चे कटआऊट लावत नाही, पोस्टर लावत नाही. कोणाला चहापाणी देत नाही. पुढच्या निवडणुकीतही मी तेच ठरविले आहे, मत द्यायचे तर द्या; पण लोकांना मी माहिती आहे अन् ते मत देतात, कारण त्यांनाही काम करणारी माणसे हवी असतात. गडकरी पुढे म्हणाले, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून महापालिका आणि नगरपालिकांची गुणवत्ता व कार्यपद्धती सुधारणे आणि त्या आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे.
या संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता, देशासाठी कसा होईल, टाकाऊपासून त्याचे रुपांतर संपत्तीत कसे होईल, यासाठी संशोधन करून नवीन संकल्पना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अमलात आणाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ५२ शाखा असून, पाच लाख विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत आजवर प्रशिक्षण दिले आहे, अशी माहिती रणजित चव्हाण यांनी यावेळी दिली.
Minister Nitin Gadkari Clarify on Contest Loksabha Election
Union Minister politics BJP