इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील ५५ कोटी गरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान योजनेचा लाभ आता मध्यमवर्गालाही मिळू शकतो. सरकारने त्याची तयारी सुरू केली असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी अर्थसंकल्पात याची घोषणा करू शकतात. आयुष्मान भारत अंतर्गत १०.७४ कोटी कुटूंबांना वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आणि कॅशलेस उपचार सेवा सध्या देण्यात आली आहे. केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष्मान भारतमध्ये मध्यमवर्गीयांचा समावेश करण्याच्या प्रक्रियेवर काही महिन्यांपूर्वी विचारमंथन सुरू झाले होते. मध्यमवर्गाला आपल्या कक्षेत आणण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे.
यातील नियमांनुसार वार्षिक उत्पन्न लक्षात घेण्याबरोबरच ते संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत याचा लाभ मिळू शकतो. परंतु, प्राधान्य खाजगी कंपन्या आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना मध्यमवर्गीयांना असणार आहे. यासाठी सरकार खासगी कंपन्यांसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना थेट आयुष्मान भारत योजनेशी जोडण्याचा पर्याय खुला करू शकते. याचा फायदा असा होईल की, या खाजगी कंपन्यां त्यांच्या कर्मचाऱ्यांना अत्यल्प प्रीमियममध्ये आरोग्य संरक्षण देऊ शकतील. अनेक कंपन्या आरोग्य विमा प्रदान करण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून प्रीमियम आकारतात. अशा परिस्थितीत आयुष्मान भारत योजनेत थेट सामील होण्याचा पर्यायही कर्मचाऱ्यांना दिला जाऊ शकतो.
गृह मंत्रालयाच्या पुढाकाराने केंद्रीय निमलष्करी दलांना आयुष्मान भारत योजनेशी नुकतेच जोडण्यात आले आहे आणि तेथे कार्यरत असलेल्या सर्व सैनिकांना आयुष्मान कार्ड दिले जात आहे. तर मध्यमवर्गीयांना आयुष्मान भारतशी जोडण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. २०१८च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आयुष्मान भारत योजनेची घोषणा केली होती. २०११ मध्ये झालेल्या सामाजिक – आर्थिक जनगणनेच्या आधारे १०.७४ कोटी कुटूंबांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत या योजनेतील एक तृतीयांशपेक्षा कमी लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड मिळाले आहे. याअंतर्गत ५५ कोटी गरीबांना आयुष्मान कार्ड दिले जाणार होते. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीला साडेतीन वर्षे उलटल्यानंतरही केवळ १७.३५ कोटी आयुष्मान कार्ड बनले आहेत. कोरोनामुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर मोठा भार पडल्यानंतर, सरकार आता लाभार्थी शोधण्यासाठी आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर आयुष्मान कार्ड देण्याची मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे.