इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापा-यावर झालेल्या हल्ल्यानंतर व्यापा-यांनी पुकारलेल्या बंदला प्रत्त्युत्तर देण्यासाठी मनसेनेही मोर्चा काढण्याचा आज निर्णय घेतला होता. पण, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारुन मनसे नेत्यांना रात्रीच अटक केली. त्यानंतरही मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यामुळे मीरा – भाईंदरमधील वातावरण तणावपूर्ण आहे. येथे मराठी – अमराठी मुद्दा या मोर्चामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
हा मोर्चाला प्रतिबंध करता यावा यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला असून आंदोनकर्त्यांना अडवलं जात आहे. तर काहींना पोलिसांनी जबदरदस्तीने व्हॅनमध्ये बसवले आहे. व्यापा-यांच्या मोर्चावेळी कायदा का नाही, अमराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी दिली मग आम्हाला का नाही असा प्रश्नही विचारला जात आहे.
दरम्यान या मोर्चाला परवानगी का देण्यात आली नाही. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांची कालपर्यंत मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार त्या रुटबाबत चर्चा सुरु होती. मनसे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल असा रुट मागत होते. पण, पोलिस त्यांना नेहमीच रुट घ्या असे सांगत होते. मात्र, मनसेने त्याला नकार दिला. त्यामुळे परवानगी नाकारली.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्च्याला परवानगी नाही… हे सरकार महाराष्ट्राचं आहे का गुजरातचं ? आमच्या नेत्यांना अटक करून मोर्चा थांबेल आणि विषय मागे पडेल असं सरकारला वाटत असेल तर त्यांनी त्या भ्रमात राहू नये. मराठी माणूसच आता या मोर्च्याचे नेतृत्व करेल.