नवी दिल्ली – कोविड -१९ च्या संकटाला सामोरे जाताना केवळ मास्कचा मोठा आधार आहे. मास्क हीच लस असल्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र, मास्क नक्की कसा असावा, तो कसा वापरावा, यासह अनेक बाबतीत सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. शास्त्रोक्त माहितीद्वारेच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखणे शक्य आहे. नेमका कोणता मास्क लावल्याने कोरोना पासून संरक्षण होईल, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारतात कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ हे सर्व लोकांना संरक्षणाची पातळी ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी एकाऐवजी दोन मास्क घालण्याचा सल्ला देत आहेत. कारण सध्याच्या विषाणूच्या प्रसाराची गती खूप वेगवान आहे. ती कमी करण्यासाठी जास्तीत जास्त संरक्षण आवश्यक आहे. दोन मास्क घालताना एक डिस्पोजेबल आणि त्यावरून आणखी एक कपड्याचा मास्क वापरणे आवश्यक आहे.
फोर्टिस-सी-डीओसी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबिटीज, मेटाबोलिक रोग आणि एंडोक्रिनोलॉजीचे अध्यक्ष अनुप मिश्रा म्हणाले की, दोन मास्कमुळे ९५ टक्क्यापर्यंत संरक्षण वाढेल. विषाणूचे नवीन रूप अधिक संक्रामक आहे आणि दोन मास्क घालणे महत्वाचे आहे. तर नवी दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटल येथील अंतर्गत औषध संचालक रोमेल टिकू म्हणाले की, डबल मास्कमुळे संरक्षण सुमारे ८० टक्क्यांपर्यंत वाढते.
नियमित कपड्याचा मास्क पुरेसे संरक्षण देत नाही. म्हणूनच सर्जिकल मास्क सोबतच कपड्याचा मास्क वापरण्याचा सल्ला आता दिला जातो आहे. या दोन गोष्टी करत असताना प्रथम मास्कची लेअरिंग वाढवा आणि हे दोन्ही मास्क देखील एकत्रितपणे चेहऱ्यावर गुळगुळीत फिट होतील, हे बघावे. एकत्र परिधान केलेले दोन सर्जिकल मास्क नाक आणि गालांच्या जवळपास अंतर असल्यामुळे संपूर्ण संरक्षणाची खात्री देत नाहीत. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी एन ९५ मास्क वापरण्याची शिफारस देखील केली आहे.
म्हणजेच कोरोनाच्या विषाणूचा मुकाबला करायचा असेल तर आता यापुढे दोनस्तरीय (डबल) मास्क वापरणे अधिक सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचा अवलंब केल्यास प्रादुर्भावाचा धोका निश्चित कमी होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.