मनमाड – मनमाड रेल्वे स्थानकापासून दोन कि.मी अंतरावर मालवाहतूक करणाऱ्या किसान रेलचे दोन डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना मंगळवारी घडली. गाडीचा वेग कमी असल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही रेल्वे पुणे येथून दानापूरकडे जात असतांना हा अपघात झाला. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी आणि येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि तांत्रिक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घसरलेले डबे बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर केले. पंधरा दिवसापूर्वी रेल्वे स्थानकाच्या ओव्हर ब्रिज खाली मालगाडीचे डबे घसरले होते. या अगोदर रेल्वेचा बंधारा आणि अंकाई रेल्वे स्थानकाजवळ क्रॉसिंग पॉईंट मध्ये बिघाड झाला होता. आता ही तिसरी घटना घडली आहे.