इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचे खाते बदल करण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची गुरुवारी सकाळी बैठक झाली. त्यात मंत्रीपद काढून घेण्यापेक्षा खांदेपालटाचा पर्यायावर चर्चा झाली. त्यानंतर सायंकाळी त्यांचे खाते बदल करण्यात आले. आता कोकाटे यांना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औेकाफ मंत्रालयाचा कारभार देण्यात आला असून त्यांच्या खाते दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले. आता राज्याचे कृषीमंत्री म्हणून अजित पवार यांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे काम बघणार आहे.
रमी प्रकरणावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापल्यानंतर सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद जाणार की खाते बदलणार यावर चर्चा सुरु होती. पण, आता या चर्चेला सरकारतर्फे पूर्णविराम मिळाला आहे. कृषीखातं आता अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर कोकाटे यांना क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे.
याअगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुध्दा इजा झाला, बिजा झाला म्हणत कारवाईचे संकेत दिले होते. रमीच्या वादावर माणिकराव कोकाटेंशी बोलून येत्या सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर गुरुवारी या विषयांवर अंतिम बैठक झाली. त्यात कोकाटे यांना अभय देण्यात आले. पण, त्यांचे खाते बदलण्यात आले.
सरकारने निर्णय घेतला असला तरी विरोधकांना मात्र हा निर्णय़ फारसा पचनी पडलेला नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.