इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी आज संवाद साधला…या संवादात त्यांनी विविध विषयांवर त्यांनी संबोधन केले. या कार्यक्रमात त्यांनी खेलो इंडिया स्पर्धेबाबत बोलतांना मनमाडच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज राजेश परदेशी याचे कौतुक केले. परदेशी याने नुकत्याच बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया 🇮🇳 यूथ गेम्स मध्ये तीन नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले त्याचा आवर्जून पंतप्रधानांनी उल्लेख केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या काही दिवसात खेलो इंडिया स्पर्धेची मोठीच धामधूम होती. खेलो इंडिया दरम्यान बिहारच्या पाच शहरांनी यजमानपद भूषवलं. तिथे वेगवेगळ्या श्रेणींचे सामने झाले. भारतभरातून तिथे पोहोचलेल्या खेळाडूंची संख्या पाच हजाराहूनही अधिक होती. या खेळाडूंनी बिहारच्या खिलाडू वृत्तीची आणि बिहारी लोकांच्या आत्मीयतेची खूप प्रशंसा केली आहे.
मित्रहो, यावर्षी खेलो इंडिया स्पर्धेत एकूण २६ विक्रम प्रस्थापित झाले. भारोत्तोलन स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची अस्मिता धोने, ओदिशाचा हर्षवर्धन साहू आणि उत्तरप्रदेशचा तुषार चौधरी यांच्या शानदार कामगिरीने सर्वांच्या मनात घर केलं. महाराष्ट्राच्या साईराज परदेशीने तर तीन रेकॉर्ड करून दाखवले. Athletics मध्ये उत्तर प्रदेशच्या कादर खान आणि शेख जीशान यांनी आणि राजस्थानचा हंसराज यानं चमकदार कामगिरी केली. यंदा बिहारनंही ३६ पदकं पटकावली. गड्यांनो, जो खेळतो तोच फुलतो. तरुण क्रीडा प्रतिभेसाठी स्पर्धा खूप महत्त्वाच्या असतात. अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यामुळे क्रीडा क्षेत्रातलं भारताचं भविष्य उज्ज्वल होऊ शकेल.