मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव तालुक्यातील अजंग येथील व्यंकटेश्वरा को ऑप पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार परिषद पार पडली. या कार्यक्रमात अमित शाह यांनी छगन भुजबळ यांना बोलावून शेजारच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मंत्रीपद नाकारल्यामुळे राष्ट्रवादीवर भुजबळ नाराज असतांना या कार्यक्रमात भुजबळांची भाजपशी जवळीक पुन्हा चर्चेत आली.
या भेटीबाबत भुजबळ म्हणाले की, अमित शाह यांनी स्वत: जवळ बोलावून खुर्चीवर बसवलं हा त्यांचा मोठेपणा आहे. यावेळी आमच्यात व्यंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पार्क बाबत चर्चा झाली आहे. अमित शाह मला म्हणत होते की तुम्ही भाषण करा. मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही येण्याच्या अगोदरच माझे भाषण केले असे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी राजकारणावर काही चर्चा झाली नाही.
भुजबळांनी या कार्यक्रमात केले हे भाषण
देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसानचा नारा दिला होता. व्यंकटेश्वरा कंपनीच्या जवानांनी अतिशय कमी कालावधीत शेती प्रक्रिया उद्योगात यश मिळवत जय जवान जय किसानचा नारा खरा करून दाखविला असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रिय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री जयकुमार रावल, मंत्री माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, डॉ.भारती पवार, माजी खासदार विकास महात्मे, आमदार नितीन बोरसे, स्वामी संविदानंद सरस्वती, व्यंकटेश्वरा कंपनीचे प्रमुख डॉ.शिवाजीराव डोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशाच्या संरक्षणासाठी जवान ज्याप्रमाणे काम करतात त्याच प्रमाणे शेतकरी देखील अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. यावरच व्यंकटेश्वरा कंपनीने आपली वाटचाल करत असून केवळ तीनच वर्षात कंपनीने शेती क्षेत्रात केलेलं काम हे बघता विश्वासच बसत नाही. अगदी उजाड माळरानावर शेतीचा केलाला विकास बघता कंपनीने मिळविलेले हे यश कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, पाचशे एकराच्या परिसरात कंपनीने शेती, दूध प्रक्रिया उद्योग, गोशाळा, खत प्रकल्प, अगरबत्ती निर्मिती, नैसर्गिक रंगांची निर्मिती असे विविध यशस्वी प्रयोग केलेले आहे. शेती क्षेत्रात विज्ञानाचा अतिशय चांगला उपयोग करून व्यंकटेश्वरा कंपनीने मोठ यश मिळविले आहे. नापीक जमिनीला सुपीक करून स्वर्ग बनविण्याचे काम डॉ.शिवाजीराव डोळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीम काम करत आहे. संपूर्ण टीमने सामूहिक रित्या मिळविलेले यश अनेकांना प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.