इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असे विधान केले. त्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. विधिमंडळातही त्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भैय्याजी जोशी यांनी मराठीविरोधी केलेल्या विधानाचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकाजवळ निषेध केला तसेच हुतात्म्यांना अभिवादन करुन ही मुंबई तुटू देणार नसल्याची शपथ घेतली.
यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले की, काल अनाजीपंत म्हणजे भैय्याजी जोशी येऊन गेले. त्यांनी मुंबईत येऊन सांगितले की मुंबईत राहणा-यांना मराठी आलेच पाहिजे असे नाही. त्यांच्या या वक्तव्यावरुन संघाचा हा छुपा अजेंडा आहे का? संघाचे दाखवण्याचे दात वेगळे आहे आणि खाण्याचे दात वेगळे आहे का? बटेंगे तो कटेंगे म्हणतात. त्या बटेंगे ते कटेंगचा अर्थ म्हणजे हिंदु – मुस्लिम नाही. मराठी – अमराठी आणि मराठा आणि अमराठा असा आहे. ते असा व्देष निर्माण करुन वाटणी करणार आहे. त्या अनाजीपंत यांनी मुंबईत जी अशी भाषा केली ती दक्षिण भारतात करुन दाखवावी गुजरातमध्ये करुन दाखवावी त्यानंतर महाराष्ट्रात सुखरुप येऊन दाखवावे असे आव्हान उध्दव ठाकरे यांनी केले.
भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात फूट पाडणारे ही लोक अनाजीपंत आणि औरंगजेब आहेत. ते मराठी – अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी किती विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकावून देणार नाही. मुंबई तोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाषावर प्रांतरचना देशाची झाली. आता मुंबईची प्रांतरचना करत आहे. भैय्याजी जोशी चिल्लर माणूस आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा मी मुख्यमंत्री असताना केला होता. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावे अशी मागणी ठाकरे यांनी केली.