मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील नर्सेसनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यातल्या सर्व रुग्णालयांमधील नर्सनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होणार आहे.
नर्ससाठी राज्यभरात अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत सरकारमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या नर्सेसवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाली असून ही पदे भरुन त्यांच्यावरचा ताण दूर करावा अशी मागणी करण्यात येत आहे. शिवाय सरकारच्या तोंडी आश्वासनांवरही त्यांनी अविश्वास दाखवला असून, कोणतेही आश्वासन दिले गेले तर ते आम्हाला लेखी स्वरुपातच देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जोपर्यंत आश्वासन लेखी स्वरुपात मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. याशिवाय २३ ते २५ मे या काळातही नर्सेसनी खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन केले. पण त्याची दखल प्रशासनाने घेतली नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. आता या कामबंद आंदोलनाबाबतही तोडगा न निघाल्यास २८ मेपासून बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेच्या मिनाक्षी शिंदे यांनी दिला आहे.
केवळ ३० टक्केच नर्स
सरकारी मेडिकल कॉलेज आणि जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये नर्सेसची संख्या अतिशय कमी आहे. एकूण पदांच्या केवळ ३० टक्केच पदे भरली गेली आहेत. तर ७० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा खूप मोठा ताण कार्यरत नर्सेसला सहन करावा लागत आहे. ही पदे भरावीत अशी मागणी करतानाच, ती कंत्राटी स्वरुपात भरली जाऊ नये यावरदेखील नर्स संघटना ठाम आहे. कायमस्वरुपी नोकरी स्वरुपातच ही पदे भरण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.