इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या सेवा आणि पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी सरकार कटिबद्ध असून महाराष्ट्रात सध्या रु. १,५५,८७४ कोटींच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. आगामी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात राज्याला रु. २३,७७८ कोटींचा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. याशिवाय, राज्यातील १३२ रेल्वे स्थानकांना जागतिक दर्जाची रूपरेषा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून संपूर्ण देशातील रेल्वे प्रकल्प झपाट्याने मार्गी लागत असून रेल्वे स्थानके, गाड्या, ट्रॅक आणि सिग्नलिंग व्यवस्था यांना जागतिक दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २०२३-२४ मध्ये पंतप्रधानांनी १००० हून अधिक स्थानकांचे भूमिपूजन केले होते.
या पुढील टप्प्यात २२ मे २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत देशातील १०३ स्थानकांचे लोकार्पण/समर्पण होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १५ स्थानकांचा समावेश आहे :लासलगाव, परळ, मुर्तिजापूर जंक्शन, चंदा फोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, आमगाव, केडगाव, देवळाली, धुळे, सावदा, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, शाहाड आणि लोणंद.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सावदा रेल्वे स्थानकावर आयोजित मुख्य कार्यक्रमास केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या स्थानकांचा विकास स्थानिक प्रवाशांसह देश-विदेशातील पर्यटकांना आधुनिक, सुरक्षित व सुविधा संपन्न सेवा देणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.