मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बंडखोर ९ मंत्र्यांकडील खाती काढून ती अन्य मंत्र्यांना देण्यात आली आहेत. मात्र, उद्धव यांनी यातून नक्की काय साध्य केले आहे. या बंडखोरांची थेट मंत्रिपदावरुन हकालपट्टी का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय वाद उसळला असून राजकारण ढवळून निघाले आहे. आता एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी ला ३९ आमदार आणि ९ मंत्री आपल्याबरोबर नेल्यानंतर शिवसेनेकडे आता केवळ ४ मंत्री उरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उरलेल्या मंत्रिमंडळात खातेवाटपात फेरबदल करावे लागले आहेत. या फेरबदलात शिवसेना तिसऱ्या नंबरवर पोहचली आहे.
शिंदे यांच्याशी सत्ता संघर्षात मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेत बंडखोरी करणाऱ्या मंत्र्यांची खाती काढून घेतली असून या मंत्र्यांच्या खात्यांचा पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपवला आहे. त्याचा थेट फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना झाला आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रिमंडळातील वर्चस्व आणखी वाढले आहे.
एखादा मंत्री आजारी असेल, अकार्यक्षम असेल किंवा त्याचे अपघाती निधन झाले तर खाते वाटपात फेरबदल करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्याच अधिकाराचा वापर उद्धव यांनी केला आहे. मात्र, हे करताना त्यांनी मोठी सावधगिरी बाळगली आहे. आपल्या कुठल्याही कृतीचा गैरफायदा शिंदे गटाने घेऊ नये याचा पूर्णपणे विचार उद्धव यांनी केला आहे. म्हणूनच बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेतली आहेत. त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवले आहे. कारण, नजिकच्या काळात कुठल्याही कायदेशीर किंवा वैधानिक अडचण किंवा समस्या समोर येऊ नये. मंत्रिपदावरुन काढले तर बंडखोरांना अधिक बळ मिळेल आणि पक्षानेच कारवाई केल्याचा कांगावा केला जाईल. ही बाब हेरुन बंडखोरांवर सावधगिरीने कारवाई केली जात आहे. केवळ खाती काढून बंडखोरांचे परतीचे दोर शाबूत ठेवण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Maharashtra Political Crisis Chief minister Uddhav Thackeray cabinet portfolio