मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील सत्ता आणि राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. भाजपने राज्यात सत्ता स्थापण्याच्या दृष्टीने आता आक्रमकपणे हालचाली सुरू केल्याचे सांगितले जात आहे. फडणवीस हे दिल्लीतून परतल्यानंतर राज्यपालांना भेटणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे लवकरच मुंबईत परतणार असल्याचे बोललं आहे. अनेक दिवसांनंतर शिंदे हे गुवाहाटील हॉटेलबाहेर मीडियासमोर आले. शिंदे हे एकदम मस्त दिसत होते. आम्ही वेगळा पक्ष काढत नसल्याचे ते म्हणाले. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. माध्यमांशी प्रथमच ते बोलले. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आम्ही पुढे नेत आहोत. आमचे प्रवक्ते दीपक केसरकर पुढील रणनीतीची माहिती देतील. एकूण ४८ आमदार आमच्यासोबत आहेत आणि आमच्यात एकजूट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. परिणामी, एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेचे दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आहेत. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवणेही अवघड झाले आहे.
अपक्ष आमदार आणि प्रहार पक्षाचे दोन आमदार हे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे पत्र राज्यपालांना देणार असल्याचे वृत्त आहे. येत्या ३० जून रोजी अविश्वास ठराव आणण्याचीही मागणी होऊ शकते, असे बोलले जात आहे. सुमारे १० आमदारांना राज्यपालांकडे पाठवले जाऊ शकते. किंबहुना, भाजप या संपूर्ण प्रकरणात सावधपणे पावले टाकत आहे आणि सरकार स्थापनेचा आपला हेतू असल्याचे उघडपणे दाखवू इच्छित नाही. अशा परिस्थितीत त्यांना स्वत: किंवा एकनाथ शिंदे गटाकडून अविश्वास ठरावाची मागणी करायची नाही. अशा स्थितीत अपक्ष आमदारांना पुढे करून संपूर्ण रणनीती राबवली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये नवीन सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचेही वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला आपल्या कोट्यात २९ मंत्री हवे आहेत, तर एकनाथ शिंदे गटाला १३ मंत्रीपदे मिळू शकतात. यामध्ये ८ कॅबिनेट मंत्री आणि ५ राज्यमंत्री असतील. शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली जात आहे. मात्र त्यावर अद्याप एकमत झालेले नाही. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या ९ बंडखोरांना पुन्हा मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. याशिवाय बंडखोर आमदार एकनाथ शिंदेही राजधानीत जाऊ शकतात. भाजप राज्यात फ्लोर टेस्टची मागणी करणार नसल्याचे बोलले जात आहे. लहान पक्ष ही मागणी करू शकतात. महाविकास आघाडी सरकार पाडण्याची भाजपची रणनीती तयार असल्याचा दावा आणखी एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
Maharashtra Political Crisis BJP Devendra Fadanvis on Delhi tour