मुंबई – विदेशी मद्य महागडे असल्याने देशीवरच समाधान मानणाऱ्यांसाठी खुषखबर आहे. कारण, राज्यातील तळीरामांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे विदेशी मद्य खरेदी करण्याकडे अनेकांचा कल वाढणार आहे.
राज्य सरकारने विदेशी दारुवरील एक्साईज ड्युटीमध्ये मोठी कपात केली आहे. ३०० टक्के असलेली एक्साईज ड्युटी राज्य सरकारने आता १५० टक्के केली आहे. अचानक सरकारने हा निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हाला सतावत असेल. सरकारने महसूल बुडविण्यासाठी नाही तर तो वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एक्साईज ड्युटीत कपात झाल्याने इतर राज्यांमधून होणारी स्कॉच व बिअरची तस्करी तसेच बनावट दारुच्या विक्रीला आळा बसेल, अशी सरकारला वाटते. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात व्हिस्की, स्कॉच, बिअरच्या किंमती कमी झाल्या आहेत. राज्यात सध्या जवळपास १ लाख विदेशी मद्याच्या बाटल्यांची विक्री होते. आता दर कमी होणार असल्याने हीच विक्री अडीच पटीने वाढण्याची खात्री सरकारला आहे.