-निखिल सुधीर कोठावदे
आज 1 मे. महाराष्ट्र स्थापना दिवस. मात्र यासोबतच आजचा दिवस “जागतिक कामगार दिवस” म्हणून सुद्धा साजरा केला जातो.
कामाच्या ठरलेल्या वेळा, कामाचे निश्चित तास, ओवरटाइम, सुटीचे दिवस, सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा, कामगार विमा,
प्रोवीडेंट फंड, मातृत्व रजा, ग्रचुइटी ..इत्यादि आज २१ व्या शतकात अतिशय सुलभ आणि हक्क म्हणून मिळणार्या या
सुविधांच्या पाठीमागे अनेक कामगार आंदोलने आणि कामगार नेत्यांचे अभ्यासू तरीही परखड विचार यामागे आहेत हे नव्याने
सांगायला नको.
भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टातील समावर्ती सूचीतील कामगार कल्याणाचा विषय समाविष्ट करण्यात आला आहे.
तसेच बेचाळीसाव्या घटना दुरूस्ती कायद्यांवये भारतीय संविधानाच्या दिशादर्शक तत्वांमध्ये कलम ४३(अ) समाविष्ट करण्यात
आले आहे ज्यायोगे कामगारांना उद्योग व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घेण्याची तरतूद करण्यात आली.
महाराष्ट्राला कामगार नेत्यांची आणि सुधारकांची फार मोठी परंपरा लाभली आहे ज्यामुळे कामगारांच्या न्याय हक्कासाठी
वेळोवेळी करण्यात आलेल्या आंदोलनात तसेच कामगारांसाठी करण्यात आलेल्या कल्याणकारी सुधारणे मध्ये महाराष्ट्र हा
नेहमीच एक पाऊल पुढे राहिला आहे. महाराष्ट्रातील अशा कामगार क्षेत्रातील अग्रणी आणि महान सुधारकांच्या तसेच कामगार
नेत्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख.
नारायण मेघाजी लोखंडे (१८४८ – १८९७ )
रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे हे भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक होते. भारतातील ट्रेड यूनियन
चळवळीचे जनक म्हणूनही त्यांची ओळख आहे. केवळ १९व्या शतकात कापड गिरणीच्या कामगारांची परिस्थिती
सुधारण्यासाठीच नव्हे तर जातीय आणि सांप्रदायिक मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या धाडसी पुढाकारासाठीही त्यांची आठवण ठेवली
जाते. महात्मा फुलेंचे प्रमुख सहकारी तर ते होतेच पण सत्यशोधक चळवळीचे धडाडीचे कार्यकर्तेही होते.
मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात,
दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुट्टीही मिळत नसे; परिणामी
लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. नारायण मेघाजी यांनी भारतातील पहिली
कामगार संघटना बॉम्बे मिलहॅंड्स असोसिएशन २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली आणि कामगारांच्या सेवेत स्वतःला
पूर्णपणे वाहून घेतले.
आपल्याला सहज म्हणून मिळणार्या “रविवार” च्या सुटीसाठी लोखंडेनी लढा दिला आणि रविवारची सुटी आजतागायत सुरू
आहे.
एन.एम.लोखंडे यांच्यामुळे गिरणी कामगारांना मिळालेले काही हक्क हे होते :
गिरणी कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी.
दुपारी, कामगारांना अर्धा तास सुट्टी मिळावी.
मिल सकाळी साडेसहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करावी आणि सूर्यास्तानंतर बंद करावी.
कामगारांचे पगार दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत करावेत.
ब्रिटिश राजवटीने त्यांना राव बहादूर ही पदवी बहाल केली होती. त्यांनी ‘मुंबई कामगार संघ’ स्थापन केला.
नारायण मल्हार जोशी (१८७९ – १९५५ )
नारायण मल्हार जोशी हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक होते. पेशाने विद्यालयीन अध्यापक असणारे ना. म.
जोशी औद्योगिक कामगार प्रशिक्षक ही होते. ना.म. जोशी यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी इ.स.
१९११ मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली. त्यांनी आयुष्यभर कामगारांच्या कल्याणाचेच काम केले.
त्यांच्या नेतृत्वात पुढे १९२९ साली AITUC (All India Trade Union Congress)ची स्थापना केली. ते मवाळ नेते होते.
नारायण मल्हार जोशी यांनी इ. स.१९११ मध्ये अलाहाबाद येथे ´सामाजिक सेवा समिती `स्थापन केली. सामाजिक प्रश्नाचा
अभ्यास व त्यावर चर्चा ही समिती करत असे. रात्रशाळा, ग्रंथालये, औषधालये हे उपक्रम य समितीने राबवले.
मुंबईतील भायखळा आणि प्रभादेवी ही ठिकाणे जोडणाऱ्या अति महत्वाच्या रस्त्याचे नाव त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ना. म.
जोशी मार्ग असे करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१ -१९५६ )
भारताच्या सामाजिक आणि राजकीय विकासाच्या उत्थानातील चमकणारा ध्रुवतारा म्हणजे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.
डॉ.आंबेडकरांचे कार्य भारतातील संविधान निर्मिती आणि दलितांच्या भल्यासाठी नेहमीच मर्यादित ठेवले जाते. मात्र या दोन
महत्त्वाच्या कामांसोबतच श्रम या महत्वाच्या विषयावरही त्यांनी आयुष्यभर लक्ष केंद्रित केले होते.
‘भारतातील जाती’ (Castes in India) या त्यांच्या एका लेखनात त्यांनी म्हटले आहे की, जात ही श्रमांची विभागणी नसून
कामगारांची विभागणी आहे. केवळ या निबंधातून त्यांनी श्रमाचा प्रश्न कामगार कल्याणाच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर
जातिव्यवस्थेतून श्रमाची उत्पत्ती आणि उत्पत्ती या दृष्टिकोनातून मांडला आहे. या जगातील सर्व संपत्ती, मालमत्ता आणि संपत्ती हे
कामगार आणि शेतकऱ्यांच्या अखंड कष्टाचे परिणाम आहेत. असे असूनही शेतात हताश होऊन कष्ट करणारा कामगार व शेतकरी
नग्न व उपाशी आहे असे त्यांचे परखड मत होते . कामगार आणि कष्टकरी यांच्या हक्कांचे रक्षण केले जाऊ शकते आणि ते तेव्हाच
सुरक्षित केले जाऊ शकतात जेव्हा राजकीय सत्तेची लगाम त्यांच्या स्वत: च्या हातात असेल. आणि म्हणून १९३६ साली स्वतंत्र
मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केली.
राज्य पुरस्कृत औद्योगिकीकरण , जुन्या उद्योगांचे पुनर्वसन , तांत्रिक शिक्षणाचा व्यापक कार्यक्रम, कारखान्यातील कामगारांना
संरक्षण देण्यासाठी मजबूत कामगार कायद्याची मागणी, स्वछता आणि गृहनिर्माण आदि विषयांवर त्यांचे विस्तृत लिखाण आणि
विचारांचाच परिपाक म्हणजे आजच्या कामगार कायद्यांचा पाया आणि त्यातील तरतुदी होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर २० जुलै १९४२ रोजी व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून सामील झाले. त्यांना
कामगार खात्याची जबाबदारी सांभाळण्यास सांगण्यात आले. कामगार कल्याण निधि, कामाचे निश्चित ८ तास, शिफ्ट मध्ये
काम, ओवरटाइम साठी अतिरिक्त वेतन, कामगारांसाठी किमान वेतन, मातृत्व हित लाभ रजा, कामगार चळवळीला बळकट
करण्यासाठी ट्रेड युनियनला अनिवार्य मान्यता, कामगारांच्या न्याय हक्कांचे रक्षण करणारा तत्कालीन औद्योगिक विवाद
अधिनियम, इत्यादि हे बाबासाहेबांच्या कामगारांसाठी वाहून घेतलेल्या कार्याचेच फलित आहे. कामगार वर्गाची अतूट एकता
मजबूत करण्यासाठी, त्यांनी जातीवाद आणि जातिव्यवस्थेचे उच्चाटन करण्याचा पुरस्कार केला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार
नाही.
श्रीधर माधव जोशी (१९०४ -१९८९)
एक निष्ठावंत समाजवादी नेते व कामगार पुढारी आपल्या सर्वांनाच “एसेम” नावाने परिचित आहेत. स्वातंत्र्याचा लढा, गोवा
मुक्तिसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी तर त्यांनी लढा दिलाच पण कामगारांची संघटना व त्यांचे प्रश्न यांत त्यांनी प्रामुख्याने
लक्ष घातले. १९६० साली त्यांनी केंद्रीय सरकारी नोकरांच्या संपाचे नेतृत्व केले. कामगार यूनियन चे नेते म्हणूनही त्यांची छवि
सर्वश्रूत होती.
ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशनचे चिटणीस, ऑल इंडिया स्टेट बँक एंप्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र परिवहन कामगार
सभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. कामगार व सेवापथक यांकरिता प्रसंगी त्यांनी उपोषणही केले आहे. त्यांच्या Aspects
of Socialist Policy (1969) या विस्तृत पुस्तकाच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली.
दत्तोपंत ठेंगडी (१९२० -२००४ )
दत्तोपंत बापूराव ठेंगडी हे मराठी कामगार चळवळकर्ते, हिंदू तत्त्वचिंतक, राजकारणी होते. ते भारतीय मजदूर संघ, भारतीय
किसान संघ, स्वदेशी जागरण मंच इत्यादी संस्थांचे संस्थापक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना समर्पित दत्तोपंत
ठेंगडी यांनी सुरूवातीला इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) च्या माध्यमातून कामगारांच्या समस्यांचे जवळून अवलोकन
केले.
कामगार क्षेत्राचे आंतर-बाह्य स्वरूप बघितल्यानंतर, २३ जुलै १९५५ रोजी भोपाळ येथे दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघाची
स्थापना केली आणि कामगार क्षेत्रात नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. कामगारांत राष्ट्राभिमान जागविण्याचे कार्य करताना भारतीय
मजदूर संघ राष्ट्रहित आणि उद्योगहिताला अधिक प्राधान्य देईल, आणि कामगारांचे ज्वलंत प्रश्न हाताळताना आवश्यकतेनुसार
समविचारी राजकीय पक्षाचा सहयोग घेईल, असे दत्तोपंतांनी पाहिले. राजकीय उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी कामगार आणि
समस्त जनतेला वेठीस धरून संप करणे दत्तोपंतांना मान्य नव्हते. भारतीय मजदूर आंदोलन विचारसूत्र, श्रमनीती, तसेच आर्थिक
आक्रमणाचे चक्रव्यूह आणि स्वदेशी ही काही दत्तोपंत ठेंगडींची श्रम आणि कामगार विषयक गाजलेली पुस्तके आहेत.
श्रीपाद अमृत डांगे (१८९९ – १९९१)
भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य अशी ओळख असलेले कॉम्रेड डांगे भारतीय कामगार चळवळीचे अध्वर्यू समजले
जातात. त्यांचा जन्म आणि शिक्षण नाशिक येथेच झाले. त्यांनी भारतावरच्या ब्रिटिश राजवटीत आयुष्याची १३ वर्षे तुरुंगात
काढली. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता.‘संप करा, याबरोबरच संप करू नका, असा आदेश
कामगारांना देऊ शकणारे दुर्मीळ नेते’ किंवा ‘संप सुरू व बंद करण्याची अचूक वेळ साधणारे कामगार नेते’ या शब्दांत कॉ. डांगे
यांचे वर्णन केले जाते.
१९२३ मध्ये मुंबईत त्यांनी गिरणी कामगार महामंडळ (गिरणी कामगारांची महान संघटना) स्थापन केली १९२४ मध्ये त्यांनी
लांब कापड संपात भाग घेतला. त्याकरता त्यांना अटक देखील करण्यात आली होती. मुंबईतील कापड कामगारांमधील कामगार
कार्यकर्त्यांना कम्युनिस्ट छत्राखाली आणण्यात डांगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डांगे हे गिरणी कामगार युनियनचे
सरचिटणीस होते. ते काही काळ वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचे सदस्यही होते. लाल बावटा, लाल सलाम हे शब्द डांगे
यांच्यामुळेच महाराष्ट्रात रूढ झाले. कामगार स्त्रियांमध्येही हक्काची जाणीव, निर्भयता, नेतृत्वगुण निर्माण करण्यात डांगे यशस्वी
ठरले होते.
डॉ. दत्तात्रय सामंत (१९३२ -१९९७ )
“डॉक्टरसाहेब” म्हणून प्रसिद्ध असलेले दत्ता सामंत एक भारतीय राजकारणी आणि कामगार संघटना नेते होते. १९८२ मध्ये
मुंबई शहरातील कापड गिरणी कामगारांच्या वर्षभर चाललेल्या संपाचे नेतृत्व त्यांनी केले होते. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेले
सामंत गिरणी कामगारांमध्ये ट्रेड युनियन कार्यात सक्रिय होते. ते इंडियन नॅशनल काँग्रेस आणि त्याच्याशी संलग्न इंडियन नॅशनल
ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये सामील झाले. आणि इंटक च्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. गिरणी कामगारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी
एकत्र करून वादळी लढा उभारणारे नेते म्हणून दत्ता सामंत यांची ओळख कधीही पुसली जाऊ शकत नाही.

-निखिल सुधीर कोठावदे
लेखक कामगार विमा महामंडळात सामाजिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
(लेखकाचे विचार वैयक्तिक आहेत.)