मुंबई – राज्यातील कोरोना संकटामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापार व उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहे. व्यापार-उद्योग क्षेत्राची घडी विस्कटू नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाने योग्य असे आर्थिक पॅकेज द्यावे, यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज’ पुढाकार घेऊन प्रयत्न करणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे.
ब्रेक दी चेन च्या १३ एप्रिलच्या आदेशानंतर व्यापार व उद्योग क्षेत्रासमोर अधिक निर्बंध असल्याने व्यापार-उद्योग क्षेत्राचे अपरीमित नुकसान होत आहे. तथापी कोरोना नियंत्रणाकरीता सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहीतीही संतोष मंडलेचा व ललित गांधी यांनी दिली.
लॉकडाऊनच्या या परिस्थितीमध्ये छोटे व्यापारी व व्यावसायिक यांना दुकान भाडे, कर्जावरील व्याज व हप्ते, नोकर पगार, प्रॉपर्टी टॅक्स, लाईट बिल आदि खर्चामुळे आर्थिक अरिष्टाला सामोरे जावे लागत आहे. व्यापारी व व्यावसायिकांच्यामध्ये आत्महत्या होण्याचे प्रकार सुध्दा समोर येऊ लागले आहेत. ही स्थिती अत्यंत गंभीर असून छोटे व्यापारी, छोटे उद्योजक व व्यावसायिक यांना आर्थिक आधाराची गरज आहे. तसेच सर्वच व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना शासकीय नियमांच्या पुर्ततेमध्ये लॅाकडाऊन मुळे अडचणी येत असल्याने करांची विवरणपत्रे, दाखल करण्याच्या मुदतवाढी सारख्या तांत्रिक बाबींवर सरकारने तातडीने निर्णय घेऊन दिलासा देण्याची गरज असल्याची प्रतिपादन चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
औरंगाबाद उच्च न्यायालयामधील विधिज्ञ अॅड. केशव चावरे, पुणे जिल्हा व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. फतेचंद राका यांनी या आदेशामधुन जीवनावश्यक श्रेणीमध्ये नसलेला व्यापार सुरू करण्यासंबंधी न्यायालयीन दिलासा मिळण्याच्या दृष्टीकोनातुन उपलब्ध पर्यायांचे सविस्तर विवेचन केले. त्यादृष्टीने पुढील प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. चेंबरचे उपाध्यक्ष उमेश दाशरथी (औरंगाबाद), चंद्रपुर इंडस्ट्री असोसिशन चे अध्यक्ष मधुसुदन रूंग्ठा, चेंबरचे विश्वस्त कैलास खंडेलवाल, यांनी उद्योग क्षेत्रासमोरील अडचणींचे विवेचन केले.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स चे राजेंद्र बाठीया, कोल्हापूर चेंबर चे अध्यक्ष संजय शेटे, चंद्रपुर चेंबरचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघी, चंद्रपुर व्यापार मंडळाचे अध्यक्ष रामजिवन परमार यांनी विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले.
महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग व व्यावसायिकांच्या अडचणी सरकारकडे मांडुन त्यात न्याय मिळविण्यासाठी उपलब्ध सर्व मार्गांचा चेंबर वापर करेल व या राज्यातील सामान्य जनतेच्या सुरक्षेबरोबरच अर्थचक‘ सुरळीत राहण्यासाठी व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांच्या पाठीशी महाराष्ट्र चेंबर खंबीर पणे उभे असल्याची ग्वाही संतोष मंडलेचा व ललित गांधी यांनी दिली.
या बैठकीत चेंबरच्या उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, श्याम सुंदर मर्दा, जयेश ओसवाल, विजय बेदमुथा, शितल केटकाळे, सागर नागरे, अविनाश पाठक, विनी दत्ता यांच्यासह व्यापार, उद्योजक संघटनांचे विविध प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी आभार प्रदर्शन केले.