नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या कोमल वर्दे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या मढी येथील कानिफनाथ यात्रेत वैदु समाजाची जातपंचायत बसण्यापासुन रोखली. केवळ एकट्या महिलेने हजारोंचा समुदाय पळवुन लावला.त्यांच्या एकटीच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्र शासनाने जातपंचायत विरोधी कायदा संमत केलेला आहे. त्यामुळे जातपंचायत बसणे,हे कायद्याने गुन्हा ठरत आहे. पुर्वी मढी येथे भटके विमुक्त समाजातील अनेक जातपंचायत भरत होत्या. मात्र या कायद्यानंतर गेल्या आठ वर्षापासुन जातपंचायत बसणे बंद झाले आहे. या वर्षी भटके विमुक्त समाजातील सर्वोच्च वैदु समाजाची जातपंचायत होण्यासाठी शनिवारी नारळ फुटले. व रविवारी सकाळी अकरा वाजता जातपंचायतीत बसुन (अ) न्यायदान करण्याचे ठरले. सदर माहिती जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना मिळाली. त्यांनी व डॅा.टी.आर.गोराणे,ॲड रंजना गवांदे कोमल वर्दे,यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला व पाथर्डी चे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तक्रार अर्ज पाठवला. त्यावर त्यांनी तत्काळ कार्यवाही करत मढी येथील यात्रेत जातपंचायतची पहाणी करण्यासाठी पथक पाठविले.
पोलीस पथकाने अशी जातपंचायत घेता येणार नाही. शिवाय सदरचे कृत्य बेकायदेशीर आहे,याची जाणीव करून घेतले. पोलीसी खाक्यामुळे मातब्बर जातपंचांनी नमते घेतले. परंतु मेळाव्याच्या नावाखाली वैदु भाषेत त्यांनी जातपंचायत चालु ठेवली. परंतु अंनिसच्या कार्यकर्त्या कोमल वर्दे या नाशिक हुन मढीस गेल्यावर त्यांना वैदु भाषा समजत असल्याने जातपंचायत बंद करण्यासाठी प्रयत्न केले. तसे पोलीसांच्या लक्षात आढुन दिले.मग पोलीस आल्याने जातपंचायतीचे लोक पळुन गेले.
त्यामुळे पीडित व्यक्तींनी पंचांच्या कचाट्यातुन सुटल्याने आनंद व्यक्त केला.अंनिसचे पोलीसांचे अभिनंदन केले आहे. या मोहिमेत पोलीस निरीक्षक विलास जाधव,पोलीस निरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलीस हवालदार अदिनाथ बढे,पोलिस नायक सुकदेव धोत्रे, पो,काॅ, ज्ञानेश्वर सानप,वाघ आदी सहभागी झाले होते.कुणावर जातपंचायतचा अन्याय होत असल्यास कृष्णा चांदगुडे ९८२२६३०३७८ यांच्याशी संपर्क करावा ,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
गुन्हे दाखल व्हावे.
वैदु समाजाची जातपंचायत ही राज्यातील सर्वोच्च जातपंचायत आहे. ती मागे कायमची बरखास्त करण्यात आली होती. तरीही इतके दिवस छुप्या पद्धतीने चालणारी जातपंचायत उघडपणे करण्याची हिंमत पंच करत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे.
-कृष्णा चांदगुडे,
राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान (अंनिस)