इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महादेवी हत्तीण (माधुरी) परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये आंदोलन झाल्यानंतर काल मुंबईत मंत्रालयात तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत हत्तीण परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आज त्यांनी वनताराचे सीईओ यांच्याशी चर्चा केली.
या चर्चेची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावर दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.
या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.