मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे एअर इंडियाच्या विमानाने रविवारी रात्री ११ वाजता आगमन झाले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी बिर्ला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानभवन येथे २३ व २४ जून, २०२५ रोजी या दोन दिवसीय परिषदेस लोकसभा अध्यक्ष बिर्ला उपस्थित राहणार आहेत.
असे आहे कार्यक्रम
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज महाराष्ट्रातील मुंबई येथे संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधीमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील. लोकसभा अध्यक्ष संसदेच्या अंदाज समितीच्या ७५ व्या वर्धापन दिन स्मरणिकेचे प्रकाशन देखील करतील.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार; महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शंकर शिंदे; महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर; आणि भारतीय संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन पंडितराव खोतकर उपस्थितांचे स्वागत करतील तर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आभार प्रदर्शन करतील. भारतीय संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधान मंडळांच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य; महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या सत्राला उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसांच्या या परिषदेदरम्यान, भारतीय संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य पुढील विषयावर विचारमंथन करतील:
‘प्रशासनात कार्यक्षमतेसाठी आणि आर्थिक शिस्तीसाठी अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मंगळवार, २४ जून रोजी, समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला; राज्यसभेचे उपसभापती हरिवंश; भारतीय संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष संजय जयस्वाल; आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील समारोप सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.