दिंडोरी – तालुक्यातील जुने धागुर शिवारात शेतमजुराच्या चार वर्षीय बालिकेला बिबट्याने उचलून नेले होते. हा बिबट्या नरभक्षक झाल्याचे स्पष्ट होत आहे. या बालिकेचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे आता या बिबट्याचा बंदोबस्त करणे वनविभाग आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जुने धागुर येथील एक द्राक्ष उत्पादक शेतकरी विलास माळी यांच्या शेतात काम करण्यासाठी वनोली सुतारपाडा गुजरात येथील काही जण शेतमजुरीस आले आहेत. त्यातीलच एक जण विठ्ठल वड यांची कन्या ऋतिका विठ्ठल वड (वय ४ वर्षे) ही रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास शेतातील शेड मध्ये खेळत होती. त्याचवेळी एक बिबट्या तेथे आला आणि त्याने त्या चिमुरडीला उचलले आणि त्याने आळंदी धरणाच्या जंगल दिशेने धूम ठोकली. घटनेनंतर बालिकेची आई व इतर नातलगांनी टाहो फोडत तिचा शोध सुरू केला. ग्रामस्थांनी पोलीस व वन प्रशासनास माहिती दिली. पोलीस व वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत बालिकेचा शोध घेतला जात होता. अखेर आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास या बालिकेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. शिवाजी सावळीराम जाधव यांच्या शेतात हा मृतदेह आढळून आल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणण्यात आला.
दरम्यान, हा बिबट्या नरभक्षक बनल्याने दिंडोरी परिसरात त्याची मोठी दहशत पसरली आहे. तसेच, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी केली जात आहे.